मुंबई – राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून दुपारच्या वेळी कडक ऊन जाणवत आहे. हवामान विभागाकडून देखील राज्यातील काही ठिकाणी एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र असे असतानाच राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र काही भागात कडक ऊन कायम राहण्याचा अंदाज आहे.
आज 4 एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तर उद्या 5 एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 7 एप्रिलपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.