शिक्रापूर (वार्ताहर)- महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरातमध्ये असताना देखील केंद्र सरकारने गुजरातच्या दोन हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली असल्याने मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता आहे.
या निर्णयाने दाखवून दिले आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका, अशा खणखणीत शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केला.
शिरुर लोकसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांच्यासोबत देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर, स्वप्नील गायकवाड, दामु घोडे, शंकर जांभळकर यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, तुमच्या माझ्या कांद्याची माती होती. तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाते, याच्याशी मोदी सरकारला काही देणंघेणं नसल्याचे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिले आहे. जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाचा खासदार डॉ. कोल्हे यांनी कडाडून विरोध केला आहे.