वडगाव मावळ -“जे पडलेत त्यांच्या नावाने निधी द्या, परंतु विकासकामे पूर्ण करा’ अशा शब्दांत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी विकासकामांवरुन सरकारला टोला लगावला.
आमदार शेळके यांनी मावळमधील विकासकामांवरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, लोणावळा ते देहूरोड असा भाग माझ्या मतदारसंघात येतो. लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने लोणावळा येथे सुसज्ज पोलीस स्टेशन करावे. पोलीस वसाहतीसाठी 12 कोटी निधी आणि जागा हस्तांतरित केली. ही कामे मंजूर करून देखील काम कुठे अडकले हेच समजत नाही.
कुंडमळा, कोथुर्णे, वराळे-नाणोली पूलाकरिता तरी निधी द्या. मागील सात-आठ महिन्यात एकाही पुलाचे काम सरकारने हाती घेतले नाही. “रिंग रोड प्रकल्प होत असताना स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला नाही. मोजणी झाल्यानंतर पाचपट मोबदला देण्यात येईल, असे सांगितलं होते. परंतु बाजारभावापेक्षा दुप्पट देखील भाव मिळत नाही. आपण शेतकऱ्यांना गृहीत धरु नका, शेतकऱ्यांवर अन्याय करु नका, कायद्याचा धाक दाखवून जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर वेगळे वळण लागू शकते. रिंगरोडचा प्रश्न सोडवायचा असेल तर समृद्धी महामार्गा प्रमाणे योग्य दर द्यावा, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
“मावळ तालुक्यातील विकास कामांवरील स्थगिती उठवा. महाविकास आघाडी सरकारने निधी दिला आहे, त्या निधीची कामे सुरू करा. काही भागातील कामे, ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते थांबवण्याचे काम जाणीवपूर्वक केले आहे. “कोविडच्या काळात सरकारने मंजूर केलेले हॉस्पिटलचे काम देखील थांबवले गेले. शेवटच्या मजल्यास मान्यता मिळत नाही. आजही आदिवासी, कातकरी भागातील वीज, रस्ते, पूल यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आम्हाला श्रेय द्या अथवा देऊ नका. जे पडलेत त्यांच्या नावाने तुम्हाला निधी द्यायचा असेल तर द्या. आमचे नाव लावा अशी अपेक्षा नाही. पडलेल्यांची नावे लावा, त्यांच्या हाताने नारळ फोडा, पण कामे पूर्ण करा. एवढीच विनंती असल्याचे आमदार सुनील शेळके म्हणाले.
“तुमच्या सरकारकडून काही नको
तुमच्याकडून काही देऊ नका. पण, आमच्या सरकारने मंजूर केलेली कामे मार्गी लावून द्या. काही गावांतील पाण्याच्या टाकींचा निधी देखील थांबविला असल्याचा आरोप आ. सुनील शेळके यांनी केला.