पुणे – मार्केट यार्डातील मुख्य बाजारात भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाट्याची आवक मुबलक प्रमाणावर होत आहे. करोनामुळे बाजार समितीकडून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामकाज दिवसाआड सुरू ठेवण्यात येत आहे. भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागातील आवक दिवसाआड होत असून त्यामुळे बाजार आवारात होणारी गर्दी कमी होत आहे.
खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजार घटकांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत आहे. बाजार आवारात प्रवेशद्वारात निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. सोमवारी मार्केट यार्डातील फळे तसेच कांदा-बटाटा विभागाचे काम सुरू राहिले.
मार्केट यार्डातील मुख्य बाजारात कांदा-बटाट्याच्या 166 गाड्यांची आवक झाली. एकूण मिळून 7 हजार 800 क्विंटल कांदा-बटाट्याची आवक झाली. 250 गाड्यांमधून फळांची आवक झाली. बाजारात एकूण मिळून 7 हजार 500 क्विंटल आवक झाली. मोशीतील बाजारात 141 गाड्या आवक झाली असून या बाजारात एकूण मिळून 3 हजार 500 क्विंटल आवक झाली.
दरम्यान, खडकी आणि मांजरी येथील उपबाजारात खरेदीसाठी होणारी गर्दीमुळे बाजार समितीच्या प्रशासनाकडून या दोन्ही उपबाजारांचे कामकाज सोमवारी बंद ठेवले. करोनामुळे खरेदी-विक्री व्यवहारात ठराविक अंतर राखण्यासाठी तूर्तास दोन्ही बाजारांचे कामकाज बंद ठेवले.
या बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.