पैसे काढून घेण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन
पुणे – करोना विषाणूमुळे गरीब नागरिकांना जास्त परिणाम झाला आहे. त्यासाठी महिलांच्या जनधन खात्यामध्ये पुढील तीन महिने केंद्र सरकार 500 रुपये जमा करणार आहे. यासंदर्भातील प्रक्रिया बॅंकांनी शुक्रवारपासूनच सुरू केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यामध्ये या योजनेची घोषणा केली होती, असे इंडियन बॅंक असोसिएशनने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. बॅंकांमध्ये यासाठी जास्त गर्दी होऊ नये याकरिता 5 दिवस ही रक्कम वाटण्यासाठी ठरवले आहेत. त्याचबरोबर बॅंकांनाही एकाचवेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
त्यानुसार लोकांना विशिष्ट दिवशी बॅंकेत येण्यास सांगण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर 9 एप्रिलनंतर या ग्राहकांना ही रक्कम कधीही काढून घेता येऊ शकेल.त्यामुळे ग्राहकांनी एकाच दिवशी बॅंकेत येण्याची गरज नाही. ग्राहकांना बॅंक शाखेत येण्याऐवजी ही रक्कम एटीएम, रुपे कार्डच्या माध्यमातूनही काढून घेता येऊ शकेल.