खालापूर – पूर्वी घरोघरी जेवणात तसेच अन्न शिजविण्यासाठी तांब्याची व पितळेची भांडी मोठ्या संख्येने वापरात होती. त्याचा औषधी गुणधर्मही सर्वांना ठाऊक होता. मात्र बदल्या जीवनशैलीचा परिणाम तांबा व पितळी भांड्यांवरही पडल्याने परिणामी प्राचीन काळापासून वापरात असलेली ही भांडी आज अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.
या पितळीच्या व तांब्यांच्या भाड्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व फायबरच्या भाड्यांनी घेतली आहे. आरोग्य सुदृढ रहावे यासाठी पूर्वीच्या काळी पितळ व तांब्याची भांडी वापरली जात असत. मात्र काळाच्या ओघात ही भांडी दुर्मिळ झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नव्या पिढीकडून रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यांसह अन्य जुन्या काळातील वस्तूंचा वापर होत नसल्याचे दिसते. यातच पितळ व तांब्याची भांडी देखील हद्दपार करून आता फायबर व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे.
सध्याच्या काळात केवळ गरजेपुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसत असल्याने स्वयंपाक घरात पितळ व तांब्याच्या भांडी आता दुर्मिळच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागासह शहरातूनही तांब्याची भांडे हद्दपार होत असल्याचे दिसून येते. दैनंदिन वापरात स्टील, फायबर यांचा वापर वाढला आहे. या वस्तूंवर विषाणू जमल्यास त्याचा नायनाट लवकर होत नाही. ही बाब आरोग्याकरिता धोक्याची ठरते, त्यामुळे तांबा व पितळ भांड्याचा गरज ओळखणे काळाची गरज आहे.
“जुनं ते सोनं’ असं म्हणतात; पण सध्या हेच सोनं कवडीमोल दराने विकलं जातयं. एकेकाळी स्वयंपाकगृहाचा कणा असलेली तांब्या आणि पितळेची भांडी स्वयंपाकगृहातून नव्हे तर अगदी घरातूनच हद्दपार होतायत. तांब्या, पितळची जागा आता स्टिलने घेतलीय. टिकाऊपेक्षा दिखाऊपणाला महत्व आल्याने जुनी भांडी मोडीत काढली जातायत. ऐतिहासिक अन्ं पारंपारिक अशा जुन्या स्मृती ठराविक लोकांकडूनच जपल्या जातात. काही वेळा त्यांना उजाळाही देण्याचे काम केले जाते.
काही ठिकाणी मात्र हाच जुना ठेवा नाहीसा करण्याचं काम केलं जातं. तांबे व पितळची भांडी कालबाह्य झाली असल्याने मोडित घातली जात आहेत. वर्षानुवर्षे जतन करून ठेवला जाणारा लाखमोलाचा ठेवा आता मोडीत काढल्याने कालबाह्य झाला आहे. आजही ग्रामीण भागात जुन्या तांब्या-पितळ्याची भांडी क्वचितच पाहायला मिळत आहे.
पूर्वी पितळी समई, निरंजन, ताट, तांब्या तसेच चमचा यांचा वापर जास्त करून देवपूजा करण्यासाठीच केला जायचा. मात्र काळाच्या ओघात ही देवपूजेची भांडी दुर्मिळ होत गेली. दुर्मिळ झालेली भांडीनंतर मोडीतच आली. वर्षानुवर्षापासून तांब्यांचे हंडे, पातेली, ताट आदी देवपूजेसाठी तसेच संसार उपयोगी भांडी लोकांकडून वापरली जायची. मात्र बदलत्या काळानुसार प्लॅस्टिक व ऍल्युमिनिअमपासून तयार केलेली भांडी वापरात येवू लागली. तेव्हापासून ही भांडी वापराविना पडून राहू लागली. पडून राहिलेली भांडी कवडीमोल दराने मोडित काढली गेल्याने ती आता कालबाह्य झाली आहेत.
लग्न समारंभात रूखवतात ठेवल्या जाणाऱ्या पितळेच्या, तांब्याच्या भांड्याची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. वजनाला हलके आणि स्वस्त असलेल्या स्टील व ऍल्युमिनिअमपासून बनविण्यात आलेली ताट, वाटी, चमचा आदी भांडी लग्न, वास्तूशांत अशा कार्यक्रमांमध्ये आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
परंतु अलिकडच्या काळात तांबे, पितळ अशा धातूंपासून तयार केलेली ताट, वाटी, चमचा, घंगाळ, तपेले, बादली, परात, कळशी, हंडा आदी भांडी कालबाह्य झाली आहेत. अशी काही भांडी जर जतन करून ठेवली नाहीतर भविष्यात ही भांडी पाहण्यासही मिळणार नाहीत, अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळेल.