श्रीकांत कात्रे
शेती किफायतशीर करण्याचे मोठे आव्हान असते. अशा वेळी शेतीला पूरक असे जोडव्यवसाय केले तर ते टुंबाला प्रगतीच्या दिशेने नेते. सुधा पाटील यांनी हाच मंत्र जपत आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम केली. शेतीतील उत्पादनाला जोडून त्यांनी रोपवाटिका सुरू केली. बरोबरच दुग्धव्यवसाय आणि कुकुटपालनही. रोपवाटिकेतील दर्जेदार रोपांमुळे परिसरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. हा सारा व्याप सांभाळताना काही महिलांना त्यांनी रोजगाराची संधीही दिली….
आपल्या शेतीप्रधान देशात शेती करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. चांगली शेती आणि वेगवेगळे प्रयोग करायचे, त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर प्रगती साधता येते, हा मूलमंत्र मनाशी बाळगून सुधा पाटील यांनी केलेली अष्टपैलू कामगिरी अचंबित करणारी आहे. कोल्हापूरजवळ करवीर तालुक्यातील महे हे त्यांचे गाव. तशी त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड. घरी आईवडिलांकडूनच त्यांना शेतीचे संस्कार मिळाले. त्यांचे वडील सरकारी नोकरी करत. मात्र, शेतीवरही त्यांचा जीव होता.
त्यातूनच सेंद्रिय शेती करण्याकडे त्यांचा कल होता. महिन्याला दोन- तीन लाखांची सेंद्रिय वांगी त्यांनी विकली आहेत. असे बाळकडू मिळालेल्या सुधा पाटील यांचे पती बाबासाहेब यांनीही शेतीची पदवी संपादन केलेली. शेती औषध विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. महे येथे तसेच कुडित्रे साखर कारखान्याजवळ अशी त्यांची दोन दुकाने आहेत. सुधा त्यांच्या दुकानात मदत करत. परंतु, आपण स्वतःही काहीतरी केले पाहिजे, या उर्मीतून त्यांनी शेतीबरोबरच शेतीपूरक असे काही करण्याचे निश्चित केले. त्यातून रोपवाटिका करण्याचे ठरविले.
महे गावाजवळ मुख्य रस्त्यावरच त्यांची रोपवाटिका आहे. या परिसरात विशेषतः ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्या प्राधान्याने ऊसाच्या विविध जातींची रोपे तयार करण्यावर भर देतात. त्याशिवाय इतर रोपेही त्या तयार करतात. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी त्या झटत असतात. त्याशिवाय शेतीतील शेंगा, भात अशा पिकांबरोबरच विशेषतः सेंद्रिय वांगी, मेथी पालक, कोथिंबिर अशा भाज्या पिकवून त्यांची विक्री करतात. दुग्धव्यवसाय, कुकुटपालन करतात. घरकाम, घरातील व दुकानातील जबाबदाऱ्या सांभाळून त्यांची ही कसरत सुरू असते. रोपवाटिका करण्याचे ठरविल्यावर माणदेशी फाउंडेशकडून त्यांना मोठे पाठबळ मिळाले. माणदेशीकडून दर्जेदार रोप तयार करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळाले.
त्यामुळे करोना संकटाच्या काळात त्यांनी रोपवाटिकेचे काम सुरू केले. परिसरातील गरज लक्षात ऊसाच्या विविध वाणांची ोपे तयार करण्याचे त्यांनी ठरविले. त्यात परिसरात प्रामुख्याने 86032 या जातीचा ऊस मोठ्या प्रमाणावर लावला जातो. 86032 शिवाय 10001, 92-5, 8005, 18121 या वाणांची रोपे त्या तयार करतात. सेंद्रिय वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर अशी रोपेही त्यांच्याकडे तयार होतात. शेतीमधून मेथी, पालक, कोथिंबिर अशा 50-50 पेंड्यांची विक्री त्या रोज करतात. दुधाच्या व्यवसायासाठी त्यांच्याकडे सहा गाईम्हशी आहेत. रोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी धारा काढणे, सकाळी डेअरीला दूध घालणे, संध्याकाळच्या दुधाचे ठराविक रतीब घालणे हेही काम त्यांनाच करावे लागते. ही सर्व कामे त्या एकट्याच करतात.
पतीची तसेच त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांची भाजी विक्रीसाठी मदत होते. रोपवाटिकेतील कामासाठी त्या महिलांची मदत घेतात. या महिला जवळच्याच वीटभट्टीवर काम करणाऱ्या आहेत. सकाळचे चार पाच तास या महिला रोपे तयार करण्याचे काम करतात. त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळतो. हे काम झाल्यावर त्या वीटभट्टीच्या कामासाठी जातात. शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांचा पुरवठा व्हावा म्हणून त्या कटाक्षाने लक्ष देत असतात. शेतामध्ये कोणते वाण घ्यावे यासाठी त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. 86032 वाण चांगला असतो. मात्र, 10001 वाण वजनला चांगला असतो, असे सांगत शेतकरी त्या वाणाची मागणी करतात. त्यावेळी हा वाण फक्त उगवणीच्या वेळी चांगला असतो असे समजावून सांगत 8032 सारख्या चांगल्या वाणाची शिफारस करतात. माणदेशीच्या शेतीविषयक कार्यशाळेतही त्या मार्गदर्शन करतात. अशा कार्यशाळेतूनही त्यांच्या रोपांची मागणी वाढते.
अशाच नुकत्याच झालेल्या कार्यशाळेनंतर त्यांची 16 हजार रोपे विकली गेली. दर महिन्याला त्यांची कमीतकमी दीड ते दोन लाख रोपांची विक्री होते. हंगाम असेल त्यावेळी यापेक्षाही अधिक रोपांची विक्री होते, असे त्या सांगत होत्या. त्यांनी कष्टपूर्वक केलेल्या नियोजनामुळे त्यांची रोपवाटिका अल्पावधीतच नावाजली गेली आहे. रोपवाटिकेप्रमाणेच दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, भाजीविक्री, भात, शेंगा यासारखी पिके या सर्वांतून त्यांनी मोठी झेप घेतली आहे. अर्थातच या साऱ्यामागे त्यांचे मोठे कष्ट आहेत.
रोज सकाळी उठल्यावर दुधाच्या धारा काढण्यापासून त्यांच्या दिवसाची सुरवात होते. नंतर स्वयंपाक व इतर घरकाम आटोपून जवळच असलेल्या रोपवाटिकेत त्या आठच्यादरम्यान जातात. सायंकाळी पाचपर्यंत तिथे काम चालते. अधूनमधून शेतीतील कामे करतात. भाजीविक्री करतात. मार्केटिंगसाठी त्यांना बाहेर जावे लागते. यातून त्यांची व्यस्त दिनचर्या लक्षात येते. कोणतेही काम आवडीने केले तर यश मिळतेच. पण त्यासाठी कष्टाची जोड द्यावी लागते. ग्रामीण भागात आपल्याजवळ असलेल्या साधनांचा उपयोग करून एखाद्या व्यवसायात यशस्वी होता येते, हे सुधा पाटील यांनी सिद्ध केले आहे.