खोडद -करोना आजारामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतामध्ये दोन महिन्यांपासून सुरु असलेले लॉकडाऊन आता 31 मे पर्यंतच्या चौथ्या टप्प्यात वाढवल्यामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय लोक चिंताग्रस्त झाले आहेत. महिन्याचा घरखर्चासह इतर अत्यावश्यक खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न या मध्यमवर्गीय व सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडले आहेत. नोकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांचे अर्थकारण बिघडलेले आहे. अशा परिस्थितीला तोंड देत कमी खर्चामध्ये घर चालविण्यासाठी प्रत्येक नागरिक जीवनावश्यक गरजांची गोळाबेरीज करून महिन्याचा खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसत आहे. करोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
लाखो लोकांचा रोजगार, नोकऱ्या गेल्या आहेत त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळून सर्वांचेच अर्थकारण बिघडलेले दिसत आहे. दरम्यान देशातील मूठभर श्रीमंत लोकांजवळ असलेल्या अमाप पैशामुळे लॉकडाऊनचा फारसा फरक त्यांना पडत नसला तरी गरीब व मध्यमवर्गीय लोकांना त्याची झळ सहन करावी लागत आहे. अनेकांजवळ साठवलेली थोडीशी पुंजीही आता 2- 3 महिन्यात संपल्यामुळे खूप मोठ्या संकटाला गरीब व मध्यम वर्गीय लोकांनाच सामोरे जावे लागत आहे.