नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या एका गटाने सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवला. तशी कृती करणारा तो शेतकऱ्यांचा चौथा गट ठरला आहे.
ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळाने तोमर यांना भेटून कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी लाभदायी असल्याची भूमिका मांडली. वादावर तोडगा काढण्याशी निगडीत काही बदल करून ते कायदे कायम ठेवले जावेत. वाद वेगाने निकाली काढण्यासाठी लवादाची स्थापना केली जावी.
अनेक वर्षांच्या लढ्यानंतर संबंधित कायदे पुढे आले आहेत. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची काही शक्तिंनी दिशाभूल केली आहे. कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणारे स्वातंत्र्य तशा शक्तिंमुळे हिरावले जाऊ नये, असे त्या शिष्टमंडळाने म्हटले.