मांजरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ncp) शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे (Jagannath shewale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar ) यांचे विश्वासू व निष्ठावंत सहकारी म्हणून जगन्नाथ शेवाळे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी यापूर्वी काँग्रेसचे व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. विधानपरिषद सदस्यपदीही काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांनी सातारा व सोलापूर जिल्हाचे निरीक्षक म्हणूनही जबाबदारी पाहिली आहे.
शेवाळे यांना जिल्ह्यात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संबंध आहे. त्यांच्या कामाच्या पध्दतीमुळे यापूर्वी अनेक वर्षे त्यांना जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. आजही त्याच उमेदीने पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम ते करतील असा सर्वांचाच विश्वास असल्याने त्यांच्यावर ही जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
सोडून गेलेल्यांना परत आणण्यासाठी बापूंचा अनुभव कामी येईल !
जगन्नाथ शेवाळे हे जुने, निष्ठावंत, पवार साहेबांच्यावरती आयुष्यभर निष्ठा ठेवलेले. सगळ्या जिल्ह्याची खडानखडा ज्यांना माहिती असलेले अनुभवी आहेत. जिल्ह्यात सध्या काही पडझडी झाल्या आहेत .परंतु ,अनुभवाच्या जोरावरती जगन्नाथ बापू शेवाळे हे पुन्हा एकदा पक्ष संघटना चांगली आणि मजबूत बांधतील असा विश्वास आहे .जे पक्षातून बाजूला गेलेले आहेत ते द्विधा मनस्थितीत आहेत पक्षातील दोन आणि तीन नंबरच्या फळीतील कार्यकर्ते खाजगीत वेगळे बोलत आहेत. आमच्याशी संपर्कही साधत आहेत. पवार साहेबांपासून त्यांना जे लांब जाव लागला आहे .ती गोष्ट मान्य नाही. लोकांची हीच भावना आहे, की पवार साहेबांना सोडू नये खालच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की पवार साहेबांना सोडू नये त्यांना पुन्हा एकत्र करण्याचे काम शेवाळे बापू करतील असा विश्वास आहे.
– जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,( शरद पवार गट)
साहेबांनी जो विश्वास ठेवला आहे तो सार्थ ठरेल !
साहेबांचे वय झाले असले तरी त्यांचा विचार तरुण आहे. कार्यकर्त्यांनी मनातील संभ्रम दूर करावा. जे पक्षात मोठे होऊन गेले त्यांना जाऊ द्या, परंतु राहिलेले निष्ठावंत जागेवरच आहेत.पवार साहेबांनी समाजासाठी आयुष्य वेचले विचारधारा कधीही सोडली नाही. आता भाकरी पलटवायची आहे,जुन्या नव्यांचा मेळ घालून संघटना मजबूत करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नव नेतृत्व निर्माण करणारा पक्ष आहे. पक्षाने आणि साहेबांनी जो विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरविण्यास मी काम करत राहीन.
– जगन्नाथ शेवाळे,जिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ( शरद पवार गट)