पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पन्नास वर्षे पुर्ण झाल्याचा गाजावाजा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या शहराचे शिल्पकार असलेल्या स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला साधा पुष्पहार घालण्यातही स्वारस्य नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालील मांजर बनलेल्या प्रशासनाला देखील अण्णासाहेबांनी आठवण झाली नाही. भाजपाच्या या व्यक्तीदोषाबद्दल आज शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.
पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीला आज पन्नास वर्षे पुर्ण झाली. या शहराच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा आणि शिल्पकार असलेल्या आण्णासाहेब मगर यांचा महापालिकेच्या मुख्यालयासमोर पुर्णाकृती पुतळा आहे.
या पुतळ्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडल्याचेच आज पहावयास मिळाले. महापालिकेतील प्रत्येक निविदेवर लक्ष ठेवून असलेल्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना मात्र अण्णासाहेबांना साधा पुष्पहार घालण्यातही स्वारस्य नसल्याचेच पहावयास मिळाले. ज्या अण्णासाहेबांनी शहराची निर्मिती केली त्यांच्यामुळेच आज सत्तेची चव आपण चाखत असल्याचा विसरही महापौरांपासून पक्षनेते व विषय समिती सभापतींना पडल्यामुळे शहरवासियांमध्ये नाराजी पहावयास मिळाली.