कुरकुंभ – परिसरात सध्या उन्हाची चाहूल वाढल्याने कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. कडक उन्हाचे चटके, दुर्मिळ झालेले पाणीसाठे यामुळे पशुपक्षी, वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वन-वन फिरावे लागत असल्याचे चित्र जिरेगाव (ता.दौंड) येथील परिसरात दिसत आहे.
जिरेगाव येथील पाझर तलावात अंदाजे पंधरा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दुष्काळाची दाहकता जाणवू शकते. सध्या उन्हाची चाहुल अधिक वाढल्याने मानवी शरीराची लाही-लाही होत आहे.त्यातच येथील तळ्यातील पाण्याची क्षमता कमी झाल्याने विहीरी देखील कोरड्या पडू लागल्या आहेत.
जिरेगाव वनविभागाच्या हद्दीतील नाला अक्षरशः उन्हाळ्याच्या सुरवातीलाच कोरडाठाक पडला आहे. पाणवठ्यात जरी थोडे फार पाणी असले तरी पाणी पिण्यासाठी वन्यजीव तलावाकडे धाव घेत आहेत. मात्र वनविभागामधील नाल्यामध्ये पाणी नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
सध्या जिरेगाव येथील तलावात 15 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, मागील महिन्यात मुख्य अभियंता सिंचन भवन पुणे यांच्याकडे जिरेगाव येथील तलावात जनाई-शिरसाई उपसा योजनेतून आवर्तनामधून तलावात पाणी सोडण्यासाठी लेखी पत्रव्यवहार केला आहे. तलावाच्या दोन्ही बाजूला वनक्षेत्र असल्याने या ठिकाणी वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असतात. तलाव भरून मिळाल्यास पुढील काही महिने पाणीटंचाई भासणार नाही.
– सोनबा मचाले, उपसरपंच जिरेगाव