नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतास मोठे यश मिळाले. जी20 समूह मानवकेंद्रित तसेच सर्वसमावेशक विकासाचा नवा मार्ग आखून देईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. जी20 परिषदेसाठी आलेले विविध देशांचे नेते राजघाटावर गेले आणि तेथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे स्मरण करत, “सब का साथ, सब का विकास और सब का विश्वास’ या मार्गाने तळागाळातील व्यक्तींची सेवा करण्याच्या उदात्त ध्येयाच्या दिशेनेच आम्ही वाटचाल करत आहोत, असे पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरून अधोरेखित केले. जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावत असेल, तर ती आनंदाचीच गोष्ट आहे; परंतु तरीही गांधीजींच्या सर्वधर्मसमभावाचा आपल्याला दिवसेंदिवस विसर पडत चालला आहे का, अशी शंका येत आहे.
“रघुपती राघव राजाराम’ हे भजन राजघाटावर वाजत असताना, त्यातील “ईश्वर अल्ला तेरो नाम’ ही ओळ गाळण्यात आली होती, यावर समाजमाध्यमांतून बोट ठेवण्यात आले. तामिळनाडूचे युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य करून अकारण वादाचे मोहोळ उठवून दिले. तर सनातन धर्म नष्ट करण्यासाठी “इंडिया’ची स्थापना झाल्याचे तारे तमिळनाडूचे शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांनी तोडले. त्यानंतर “सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांची जीभ हासडू आणि सनातनकडे वटारले जाणारे डोळे उपटून काढू’, अशी उघड धमकी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पुण्यात महापालिकेच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे यांनी चिथावणीखोर भाषण केले. अधिकाऱ्यांचे मुस्काट फोडण्याची भाषा त्यांनी केली. मे महिन्यात अन्य धर्मीयांच्या त्र्यंबकेश्वर प्रवेशामुळे झालेल्या वादंगानंतर नितेश हे तेथे गेले आणि त्र्यंबकेश्वरात चादर चढवणाऱ्यांना उत्तर मिळेल, अशी गर्जनाही त्यांनी केली. त्यापूर्वी राहुरी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेत हिंदूंवर खोट्या केसेस दाखल करू नयेत, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा त्यांनी दिला होता. सार्वत्रिक निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अडीच वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करून वातावरण पेटवले. त्यामुळे देशाची राजधानी काही दिवस जळत होती. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी मुझफ्फरनगर येथे दंगल घडवून, मते मिळवण्याचा उपद्व्याप करण्यात आला. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हेही भडकावू विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेथे गेले असतानाच वातावरण पेटले होते. हरियाणात नूह येथे मध्यंतरी हिंदू-मुस्लीम दंगल झाली. मोनू मानेसर याने गोरक्षेच्या नावाखाली हत्या घडवून आणली, असा आरोप आहे. त्याने समाजमाध्यमांवर प्रक्षोभक पोस्ट टाकली आणि त्यानंतर नूह पेटले. तो फरार असल्याचे सांगण्यात येत होते, तेव्हादेखील तो वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबवर टाकत होता.
अखेर त्याला अटक झाली असली, तरीदेखील यानंतर कॉंग्रेसच्या एका आमदारास अटक करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मानेसर याला केवळ अटक करण्याचे नाटक रचल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा असून, त्यामुळे उत्तर भारताच्या तुलनेत इथे कमी दंगे झाले आहेत. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, महाराष्ट्रातील सलोखा बिघडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर काही तासांतच समाजमाध्यामांवर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात दंगल उसळली. गेल्या रविवारी रात्रीच तरुणांच्या संतप्त जमावाने या घटनेशी संबंधित भागातील काही घरे, दुकाने आणि वाहनांना आगी लावल्या. एका प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला आणि या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाला आणि दहाजण जखमी झाले.
वास्तविक कराड, सातारा हा पट्टा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू महाराजांना मानणारा. त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचाही या भागावर पगडा आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग तेथे असून, साताऱ्यात कधीही धार्मिक दंगली उसळल्याचे ठळक उदाहरण नाही. मात्र, केवळ साताराच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अलीकडील काळात हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. भडकावू भाषणे दिली जात आहेत. भीमा-कोरेगाव येथे कोणकोणत्या प्रवृत्तींनी माथी बिघडवली आणि एकूण पश्चिम महाराष्ट्रातच बहुजन समाजाच्या तरुणांच्या मनावर विषारी संस्कार कोण करत आहेत, हे सर्वश्रुत आहे. परकीय गुंतवणूक, उद्योगधंदे यात महाराष्ट्राचे अग्रस्थान होते व आहे; परंतु गेल्या सहा महिन्यांत राज्यातील नऊ शहरांमध्ये जातीय दंगल व तणावाच्या घटना घडल्या आहेत.
अकोला, जळगाव, नगर, शेवगाव, संगमनेर, संभाजीनगर, कोल्हापूर तसेच मुंबईत मालवणीला धार्मिक हिंसाचार घडला. समाजमाध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या पोस्ट, कुठे एखाद्या मिरवणुकीवरून तर कुठे मोठ्याने ध्वनिक्षेपक लावण्यावरून वाद निर्माण होऊन, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय अनिश्चितता वाढली असून, सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. पक्षांमध्ये फोडाफोड करून सरकार स्थापन करायचे वा ते अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न झाले आहेत.
मात्र, आगामी निवडणुकांत सत्तेच्या बळावर व भरपूर जाहिरातबाजी करूनही यश मिळण्याची शक्यता धूसर दिसत असेल, तर मते मिळवण्यासाठी ध्रुवीकरणाचा मार्ग स्वीकारला जात असावा, अशी चर्चा आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपल्या स्पर्धेपायी जातीय तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. कारण, दंगलीत शेवटी जीव जातो, तो सामान्य माणसाचा हे विसरता कामा नये.