– गणेश काळे
इंटरनेट हाताळताना आपल्या मुलांवर वॉच ठेवण्यासाठी सेफनेट हे अॅप येणार आहे. मात्र, हे अॅप फायदेशीर ठरण्याऐवजी त्याच्या वापरावरच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मुलांचा वाढता स्क्रिन टाइम हा सर्वच पालकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असल्याने पालकांना मुलांसाठी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. अशा स्थितीत काहीवेळा इंटरनेटचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी त्यांच्या ऑनलाइन घडामोडींवर देखरेख करण्यासाठी अॅप किंवा संकेतस्थळ आणण्याचे प्रयत्न होत असले तरी इंटरनेटच्या मायाजालमधून त्यांना कितपत वाचवता येईल, हा प्रश्न आहेच. अर्थात त्यादृष्टीने टाकण्यात येणारे पाऊल हे कौतुकास्पद आहे.
अलीकडच्या एका अहवालानुसार, भारतात इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सध्या ‘सेङ्गनेट’ अॅपवर काम करत असून तो अॅप पालक आणि पाल्य यांच्या ङ्गोनमध्ये कनेक्टिव्हिटी ठेवण्याचे काम करणार आहे. याप्रमाणे मुलांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटी पालकांपर्यंत पोचू शकतील. अशा प्रकारचे देखरेख करणारे अॅप किंवा संकेतस्थळ सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर मुले कितीकाळ ऑनलाइन राहतात, हे तपासण्याची व्यवस्था असेल. त्याचवेळी सेङ्गनेट हे यूट्यूबसारख्या साइटवर दाखविण्यात येणार्या सामग्रीची माहिती देण्याबरोबरच कॉल डिटेल्स आणि मेसेज देखील शेअर करेल, असे म्हटले जात आहे.
‘इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशन ऑङ्ग इंडिया’ यांनी मात्र हे अॅप सर्व ग्राहकांच्या ङ्गोनमध्ये डिङ्गॉल्ट रूपात असायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मुलांची ऑनलाइन सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांवर होणार्या दुष्परिणामाबाबत चर्चा होणे स्वाभाविक आहे. अर्थात मुलं इंटरनेटचा वापर कसा करतात, कशासाठी करतात आणि का करतात, यानुसार त्यांच्या प्रभावाचे आकलन करायला हवे. मात्र धोरणकर्त्यांच्या मते, प्रत्यक्षात दैनंदिन जीवनाप्रमाणेच आभासी जगातही लक्ष ठेवण्याचे पालकांनी कर्तव्य बजावले पाहिजे. अर्थात, या ठिकाणी काही बाबींचा विचारही करायला हवा.
पहिली म्हणजे वास्तविक जगातही पालक मुलांपर्यंत पोचणार्या सर्व माहितींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एखादी गोष्ट किंवा घटना मुलांना कशी कळाली, हे ऐकून काहीवेळा पालकांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. कारण मुलांच्या मित्रांत सुरू असलेल्या चर्चेपासून पालकमंडळी अनभिज्ञ असतात. अशा स्थितीत ऑनलाइन जगात पालकांनी मुलांच्या सक्रियतेला लगाम घातला तर संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता अधिक राहू शकते. बालमानसोपचार तज्ज्ञांच्या मते, पालकांचे लक्ष आणि मुलांची स्वायत्तता यांच्यात पुसटशी रेषा असून ती ओळखणे गरजेचे आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, खासगीपणा, गोपनीयतेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणार्या उपकरणांचा दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: आपल्याच कुटुंबात सापत्न व्यवहाराचा सामना करणार्या मुलांसाठी ही बाब चिंताजनक आहे. याशिवाय ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5’ नुसार भारतात एकतृतीयांश महिला आपल्या जोडीदाराकडून कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात. अशावेळी पत्नीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बरीच मंडळी या उपकरणांचा वापर करू शकतात. एवढेच नाही तर या माध्यमातून मुलांच्या तुलेनत मुलींच्या दैनंदिन जीवनावर देखील नियंत्रण मिळवले जाऊ शकते, जसे आपण प्रत्यक्षातील जीवनात अनुभव घेत असतो.
मुलांची ऑनलाइन सुरक्षा निश्चित करताना अनेक समस्यांचा जन्म होऊ शकतो. त्यामुळे सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला सर्वात अगोदर कायद्यात सुधारणा करावी लागेल. उदाहरणार्थ, आयटी अधिनियम 2000 ची जागा घेणार्या नव्या भारतीय कायद्यात ब्रिटनच्या एज अप्रोपिएटड डिझाइन कोड (ज्याला आपण मुलांची संहिता म्हणतो) आणि ‘द ओटिरोवा न्यूझीलंड कोड ऑङ्ग प्रॅक्टिस ङ्गॉर ऑनलाइन सेफ्टी अँड हार्म्स’ या सारख्या नियमांची तरतूद हवी.
दुसरे म्हणजे पूर्वीपासूनच उपलब्ध असलेल्या नियंत्रण उपकरणांना अधिक सक्षम करण्यासाठी ऑनलाइन घडामोडी, व्यवहार निश्चित करावे लागतील. तिसरे म्हणजे आपण शिक्षण संस्थांना देखील या घडामोडीत सामील करून घेणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात पालक हे मुलांच्या ‘स्क्रिन टाइम’वरून चिंतेत असतात आणि यासंदर्भात धोरण आखताना पुनर्विचार करणे गरजेचे आहे. अर्थात, सध्याच्या काळात मुलांचा स्क्रिन टाइम लक्षणीय वाढला आहे. चौथी गोष्ट म्हणजे, कोणताही मार्ग किंवा सल्ला हे मुलं मोकळ्या मनानं स्वीकारणार नाहीत, याची जाणीव सर्व शिक्षक आणि पालकांना असते. कारण मुले इंटरनेट वापराबाबत अधिक कुशल असतात आणि ते रचनात्मक पातळीवर वापर करत असतात. म्हणून मुलांनी स्वत:च सायबर किंवा ऑनलाइन सुरक्षेबाबत पुढाकार घ्यावा, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
‘यंग लीडर्स ङ्गॉर अॅक्टिव्ह सिटीझनशिप’च्या एका सर्वेक्षणानुसार 80 टक्के पालक हे इंटरनेटवर अधिक वेळ घालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच इंटरनेटवर काही अडल्यास तेच मुलांची मदत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आजकाल पालक स्वत:च ‘रील’मध्ये आकंठ बुडालेले असतात, तर मग मुलांवर लक्ष कोण ठेवणार?