– अरुण गोखले
मानवी मनात आलेले विचार म्हणजेच कल्पना. कल्पनेचे दोन प्रकार असतात. एक चांगल्या कल्पना तर दुसर्या वाईट कल्पना. ज्याप्रमाणे दुरितांचे तिमीर जावो! विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांच्छिल तो ते लाभो, प्राणिजात॥ असे पसायदान संत ज्ञानदेवांनी अवघ्या मानवजातीच्या कल्याणाकरता मागितले अगदी तसेच आपल्या वारकरी लोकांसाठी संत नामदेव महाराजांनीही पसायदान या सावळ्या श्रीहरीकडे मागितले.
त्यात त्यांनीही त्यास हेच मागणे मागितले आहे की- कल्पनेची बाधा न होय राजसा! माझ्या विष्णू दासा भाविकासी॥
या मागणीत मानवी मनातल्या कल्पनेला नामदेवांनी ती बाधा आहे, तो विकार आहे, असे म्हटले आहे.
कारण, माणसाचे मनच अनेक चांगल्या- वाईट गोष्टी चिंतत असते. त्याच्या मनातच वाईट विचार येत असतात. जीवनातल्या कसोटीच्या क्षणी पळपुटेपणा करणे, आत्मघात, आत्महत्येचा विचार मनात येणे. चांगल्या सुरक्षित स्थानी असूनही मनातील काल्पनिक भीतीने चिंताग्रस्त होणे.
उद्याच्या मरणाच्या भीतीने आजचा सुखाचा दिवस खराब करून घेणे, मृत्यू, चोरी, आग, दुष्कर्माचरण या गोष्टींचे विचार मनात आणायचे आणि आजची सुखाची झोप खराब करून घ्यायची हे कशामुळे घडते तर ते नको त्या कल्पनांच्या खेळात गुंतल्याने.
या कल्पनेची बाधा एकदा का माणसास झाली की त्याचा विवेक विचार काम करत नाही. त्याचे शांत चित्त अस्थिर होते. त्याची निर्भयता मोडते आणि काल्पनिक भीतीने तो घाबरून जातो. दोरीला साप मानणे, सावल्यांची भीती वाटणे हा त्या कल्पनेच्या बाधेच्याच खुणा आहेत. तो एक कमकुवत मनास झालेला काल्पनिक रोग आहे.
अशा वाईट विचारांना मानवी मनात जरासुद्धा थारा मिळू नये, त्यांचे मन हे अश्रद्ध, डळमळीत होऊ नये. हेच मागणे नामदेवराया पांडुरंगाकडे मागतात. या कल्पनेच्या बाधेस दूर करण्याची ताकद आणि त्याची किल्लीही त्यालाच माहीत आहे. कारण तोच आपल्या भक्तास तू तुझ्या सार्या चिंता, भय, कल्पना माझ्यावर सोड असे म्हणतो.