– सुनील चौधरी
कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी कॅनडातील खलिस्तानवादी घटनांकडे केवळ एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पाहण्यापेक्षा भारताच्या दृष्टिकोनातूनही विचार करायला हवा.
जी 20 परिषदेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो भारतात आले होते. कॅनडात खलिस्तानवादी भारताच्या विरोधात विष ओकत आहेत. अत्यंत मुजोर झाले आहेत. यासंदर्भात ट्रुडो यांना भारतीय पत्रकारांनी विचारणा केली. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले. ते आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे ट्रुडो म्हणाले. त्यांच्या देशात त्यांचे नागरिक असलेल्या खलिस्तानवाद्यांनी काय गोंधळ घालायचा तो घालावा. ट्रुडो यांनी त्यांच्या अभिव्यक्तीचे खुशाल समर्थन करावे. पण ते जर भारतीय वंशाचे लोक आणि भारतीय संस्थांना लक्ष्य करत असतील तर ट्रुडो यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय कामाचे?
भारतात कथित खलिस्तानवाद्यांनी पुन्हा धुसफूस सुरू केली आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी त्यांचा एक म्होरक्या अचानक प्रकट झाला होता. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी पंजाबच्या एका शहराच्या पोलीस ठाण्यासमोर तलवारी आणि बंदुका नाचवल्या. म्होरक्या नंतर फरार झाला. त्याला जेरबंद करण्यात आले. त्याची आता फारशी चर्चा होत नाही. त्याने मोजक्या काही आठवड्यांत ज्या प्रकारे पंजाब अशांत करण्याचा तेव्हा प्रयत्न केला तो काही अचानक घडणारा प्रकार नाही. या खलिस्तानवाद्यांच्या कथित संघर्षाला आणि मागणीला भारतात थारा नाही. पंजाबमध्येही कोणी त्यांच्या समर्थनासाठी पुढे आलेले नाही. त्यांची भारतात कालवाकालव करण्याची कृती केली जातेय ती भारताबाहेरून.
भारताच्या विरोधातील कोणत्याही विदेशी शक्तींचा आणि प्रत्यक्ष भारतद्वेषी राष्ट्रांची त्यांना फूस असू शकते. त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. भारताला जखमी करणे अथवा गृहकलहात गुंतवून ठेवणे. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांतही खलिस्तानवाद्यांनी डोके वर काढले आहे. भारताच्या विरोधात त्या देशांत त्यांनी आंदोलने केली, भारतीय आणि भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्याचे प्रयत्नही केले. एक कॅनडा वगळता अन्य देशांत त्यांना रोखण्यात आले. कॅनडात मात्र तसे झाले नाही अन् होण्याची शक्यताही दिसत नाही.
आता काही आठवड्यांपूर्वीचीच घटना आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करणारी मिरवणूक कॅनडात काढली गेली. बराच काळ त्यांचा गदारोळ सुरू होता. हिंदूंची काही मंदिरेही लक्ष्य करण्यात आली. भारतीय दूतावासावर हल्ला केला गेला, भारतीय राजनीतिक अधिकाऱ्यांना धमकावले गेले. शिक्षणासाठी कॅनडात जाणाऱ्या भारतीय मुलांना धमकावले जाते आहे, तेथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या इतर नागरिकांनाही भीतीच्या छायेखाली जगावे लागते आहे.
भारताकडून या विषयी नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या राजदूताला पाचारण करून त्यांच्याकडे कडक शब्दांत निषेधही नोंदवण्यात आला. मात्र, त्यांनी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. पुढेही ती होण्याची शक्यता कमीच आहे. त्याची काही कारणेही अर्थातच आहेत. ट्रुडो या प्रकाराकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पाहात असतील तर त्यांच्या विशाल हृदयाबाबत तक्रार नाही. त्यांनी तेथील खलिस्तानवाद्यांच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना अन्य भारतीय वंशाचे नागरिक आणि अधिकारी यांच्या रक्षणाच्या जबाबदारीचेही स्मरण ठेवावे. कॅनडात खलिस्तानवाद्यांचा काय उत्पात सुरू आहे याच्या बातम्या भारतात येतात.
तेथील भारतविरोधी शक्तींची संघटित टोळ्या, अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांशी हातमिळवणी, मानवी तस्करी हे सगळे प्रकार भारतापर्यंत आले आहेत. हे भारताच्या दृष्टीने घातक आहेत तर ते कॅनडासाठीही निश्चितच घातक असणार आहेत. कॅनडाने यामागचे अर्थकारण, त्यात गुंतलेले लोक, त्यांचे अंतस्थ हेतू याकडे दुर्लक्ष न करता आणि त्यांचे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे इतक्या उथळपणे याकडे न पाहता याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सातत्याने हे विषय कॅनडासमोर आणले आहेत.
द्वेष आणि हिंसाचाराला आमचा विरोधच आहे, असे ट्रुडो यांनी भारतात सांगितले. एखाद्या समुदायातील काही मूठभर व्यक्तींच्या कृतीसाठी संपूर्ण समाजाला पिंजऱ्यात उभे करता येत नाही. त्याचे कारण ते काही संपूर्ण कॅनडाचे प्रतिनिधित्व करत नाहीत असे शहाणपणाचे बोलही ट्रुडो यांनी सांगितले आहे. त्यांचे म्हणणे रास्तच आहे. पण काही मूठभर मूलतत्त्ववाद्यांमुळेच एखादा विशिष्ट समाज अथवा समुदाय विनाकारण बदनाम होत असतो. हे मूलतत्त्ववादी कोणत्याही धर्मात असतात. मात्र, त्यांचा स्वत:चा असा कोणता धर्म असत नाही.
जगाच्या पटलावर भारताचे महत्त्व काय आहे याची ट्रुडो यांना आणि अर्थातच अन्य देशांना पुरेपूर कल्पना आहे. भारत ही जगातील अत्यंत महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. जगाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांची भरभराट होण्यास मदत करण्याच्या कामात भारत कॅनडाचा महत्त्वाचा भागीदार असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. पण हे त्यांना भारतविरोधी फुत्कार आपल्याच देशातून निघतात त्यावेळीही लक्षात असायला हवे.
ट्रुडो यांच्या देशांतर्गत राजकारणामुळे त्यांच्यावर काही मर्यादा येत असतील. त्याचे कारण ट्रुडो कॅनडातील न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत आहेत. या पार्टीचा प्रमुख जगमितसिंग धालिवाल हा खलिस्तान समर्थक आहे. जेव्हा सत्तेसाठी कोणाचा टेकू घेतला जातो तेव्हा व्यापक देशहिताचे मुद्दे काही वेळा बाजूला ठेवावे लागतात किंवा गुंडाळून ठेवावे लागतात. तसे ट्रूडो यांना इच्छेविरूद्ध करावे लागत असेल याची दाट शक्यता आहे.
पण अंमलीपदार्थ. संघटित टोळ्या, शस्त्रास्त्रे, द्वेष पसरवणारे, निरपराध्यांना लक्ष्य करणारे कोणाचेच समर्थक होऊ शकत नाही आणि त्यांचे कोणी समर्थन घेऊही नये. कारण, पेटवापेटवीतच ज्यांना स्वारस्य असते त्यांना शांतता, सामंजस्य, सलोखा, प्रगती या शब्दांची ऍलर्जीच नाही तर भीती वाटत असते. एका ठिकाणी खदखद निर्माण केल्यावर ते दुसरे घर शोधतात. ते घर ट्रुडोंचा स्वत:चा देशही असू शकतो. हेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना सूचित केले आहे.