लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेससोबत जातील, असे भाकित शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा विलीनीकरण या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची अर्धी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे भाकित केले आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत केलेली विविध वक्तव्य आणि त्याचे टाइमिंग लक्षात घेता या काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबतच्या वक्तव्याचे टायमिंग आणि त्याचे महत्त्व यालाही निश्चितच काहीतरी अर्थ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विलीनीकरणाची ही प्रक्रिया सुरू होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
याचे दोन अर्थ निघू शकतात, एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीने पुन्हा एकदा विजय मिळवून नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाले तरीसुद्धा काँग्रेसला एकत्रीकरण आणि विलीनीकरणाची मोहीम राबवावीच लागणार आहे किंवा जरी या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाली नाही किंवा अपेक्षित यश मिळाले नाही तरीसुद्धा काँग्रेस आणि मित्र पक्षांमध्ये ही विलीनीकरण आणि एकत्रीकरणाची मोहीम वेग पकडू शकते. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांनी कोणताही कौल दिला तरी देशातील विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होईल असेच शरद पवार यांना म्हणायचे आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार का, याबाबत मात्र शरद पवार यांनी स्पष्ट काही न सांगता सहकार्यांशी चर्चा करूनच आगामी कालावधीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत पण काँग्रेस आणि आमची विचारधारा एकच आहे, असे सुचवले आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची विचारधारासुद्धा आम्हाला मान्य होण्यासारखी आहे, असेही त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे. या सर्व मुलाखतीमधील आणखी एक महत्त्वाचा भाग हा आहे की राजकारणातील नवीन पिढीला कोणत्याही परिस्थितीत सत्तेच्या दिशेने आणि सत्तेच्या बाजूने जायचे आहे. साहजिकच काँग्रेसच्या विचारधारेसाठी अशा प्रकारचे विलीनीकरण किंवा एकत्रीकरण गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे गेल्या 130 ते 135 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक वेळा विघटन होऊन प्रादेशिक पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे अनेक नवीन गट तयार झाले. काळाच्या ओघात त्यापैकी अनेक गट किंवा पक्ष पुन्हा काँग्रेसला जाऊन मिळाले असले तरी राज्याराज्यांमध्ये काँग्रेसची विचारधारा मानणारे पण वेगळा सवता सुभा करणारे अनेक राजकीय पक्ष आजही अस्तित्वात आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याचे ठळक उदाहरण आहे. या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस असो किंवा हरियाणा आणि पंजाबमधील काँग्रेसचे काही गट असोत किंवा ईशान्य भारतामध्येसुद्धा स्थानिक पातळीवर स्थापन झालेले काँग्रेसी विचारधारा मानणारे काही पक्ष असोत असे अनेक पक्ष आपला मूळचा काँग्रेसचा डीएनए जपून ठेवून काम करत आहेत.
पण आज काही राज्यांमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले प्रादेशिक पक्ष एवढे मोठे झाले आहेत की ते पुन्हा मूळ पक्षामध्ये सामील होतील अशी कोणतीही शक्यता नाही. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. तसेच जे काँग्रेसपासून बाजूला गेले आणि नंतर त्याही पक्षाचे विविध तुकडे होऊन जे विविध राजकीय पक्ष राज्याराज्यांत अस्तित्वात आहेत त्यांचीही काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता खूप कमी असली, तरी काँग्रेससोबत एकत्र राहण्याची शक्यता जास्त आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष असो किंवा बिहारमधील लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल असो किंवा दक्षिण भारतातील द्रमुकसारखे पक्ष असो अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण हे पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली मात्र निश्चितच एकत्र येऊ शकतात आणि शरद पवार यांना या मुलाखतीद्वारे हेच सुचवायचे आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा गेल्या आठवड्यामध्ये अशाच आशयाचे विधान केले होते. विद्यमान राजकारणाचा विचार करता सध्या काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी अनेक प्रादेशिक मित्र पक्षांच्या तुलनेत त्यांची बाजू थोडी कमकुवत आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे नाव अद्याप या आघाडीने जाहीर केलेले नाही, पण शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर असे अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले किंवा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले तर काँग्रेसची ताकद जास्तच वाढणार आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना झाली होती तेव्हा त्या आघाडीमध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता आणि इतर घटक पक्षांना त्यामानाने कमी महत्त्व होते.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भाजप ज्या प्रकारचे प्रभावशाली राजकारण करत आहे त्याला सडेतोड उत्तर द्यायचे असेल तर काँग्रेससारख्या एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाखालीच ते उत्तर देणे शक्य होणार आहे याची जाणीव पुन्हा एकदा करून देण्याचे काम शरद पवार यांनी आणि काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर जर त्यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळाल्याचे लक्षात आले तर या प्रयोगाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता जेव्हा ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये एखादे विधान करतो तेव्हा त्याला निश्चितच खूप महत्त्व असते हे सुद्धा या ठिकाणी विसरून चालणार नाही म्हणूनच त्यांचे हे भाकित सर्वांनीच विचार करावा असे आहे.