नवी दिल्ली – भारताचा विकास दर कमी होणार असला तरी भारत यातून लवकरच विकासाच्या महामार्गावर पोहोचेल, असे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटत आहे.
गेल्या आठवड्यात या गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारात 8,327 कोटी रुपयांची खरेदी केली. या गुंतवणूकदारांनी 7 हजार 842 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर कर्जरोखे क्षेत्रात 485 कोटी रुपयांच्या रोख्यांची खरेदी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात म्हणजे जून महिन्यात या गुंतवणूकदारांनी 24 हजार 53 कोटी रुपयांच्या शेअरची तर जुलै महिन्यात 3 हजार 301 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. या कालावधीत भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच प्रमाणात वधारले आहेत.
लॉकडाऊनच्या काळातही भारतातील मोठ्या कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. याची सकारात्मक दखल या गुंतवणूकदारांनी घेतली असल्याचे दिसून येते. दरम्यान, सरलेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ सव्वा टक्क्याने वाढले. त्यामुळे भारतातील पहिल्या दहा मोठ्या कंपन्यांच्या भांडवली मूल्यात 74 हजार 240 कोटी रुपयांची वाढ झाली. सध्या निर्देशांक उच्च पातळीवर आहेत.