चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे डॉ. राजेश टोपे यांचे निर्देश
कराड (प्रतिनिधी) – सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील करोनाबाधितांचे बरे होण्याचा दर वाढविण्यावर आणि मृत्यूदर कमी करण्यावर शासनाचा भर आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवण्यात येणार. दोन्ही जिल्ह्यांमध्ये बाधितांच्या जास्तीत जास्त निकट सहवासितांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सातारा येथे जिल्हा रुग्णालयात उद्या, दि. 10 पासून कोव्हिड टेस्टिंग लॅब सुरू केली जाणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराबाबत लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची बदलीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. राजू आवळे, आ. शशिकांत शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.
डॉ. टोपे म्हणाले, करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. त्यासाठी निकट सहवासीतांच्या तपासण्यांवर अधिक भर दिला आहे. करोनाच्या रॅपिड ऍन्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा येथे आरटीपीसीआरची नवीन लॅबचे कामकाज सोमवारपासून सुरू होईल. बाधितांचे अहवाल 24 तासांच्या आत आले पाहिजे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढणे हा काळजीचा विषय असला तरी रिकव्हरी रेट वाढणे आणि मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न आहे.
खासगी रुग्णालये इतर रुग्णांच्या करोना चाचण्या झाल्याशिवाय उपचार करत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा रुग्णांची ऍन्टीजेन टेस्ट करावी. त्याचा अहवाल तात्काळ मिळतो; परंतु या रुग्णालयांनी कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारू नयेत. उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, असा आदेश देण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा कोव्हिड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश आहेत. त्यावर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य अधिकारी नियुक्त करावा. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील व आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ही भरती तात्काळ करण्यात येणार आहे. त्यासाठी गुणवत्ता हाच निकष लावला जाणार आहे.
राज्यात नवीन 500 रुग्णवाहिका
राज्याच्या दुर्गम भागातील करोनाबाधितांना तातडीने उपचार मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून नवीन पाचशे रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती डॉ. राजेश टोपे यांनी दिली.
सातारच्या “सिव्हिल’चे “ऑपरेशन’ होणार
सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. मग, ते सिव्हिल सर्जनचे असोत की, इतर डॉक्टरांचे असोत. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाचेच “ऑपरेशन’ करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. टोपे म्हणाले.
खासगी रुग्णालयांमधील बिलांवर मर्यादा
करोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालये लाखो रुपयांची बिले आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोव्हिड रुग्णांवरील उपचारांसाठी बिलांवर मर्यादा घालण्यात आली आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. कोणी जादा बिल आकारत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून भरारी पथके नेमण्यात आल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.