जयपूर – राजस्थान विधानसभेच्या 200 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सगळ्याच प्रमुख नेत्यांना राज्यात प्रचाराचा धुरळा उडवला आहे. अशातच पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठे विधान केले आहे. गेल्या 30 वर्षांपासून गांधी कुटुंबातील कोणीही सदस्य देशाचा पंतप्रधान झालेला नाही. त्यामुळे त्यांना टीकेचे लक्ष्य केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जयपूर येथे बोलताना गेहलोत म्हणाले की, आम्हाला स्थानिक मुद्द्यांवर आणि विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवावी लागेल. भारतीय जनता पार्टी केवळ खोटे आरोप करते आहे. ते आमच्या धोरणावर आणि आमच्या मुद्द्यांवर बोलत नाहीत. मला वाटते की हा पक्ष घाबरला आहे कारण राजस्थानची जनता पुन्हा याच पक्षाचे सरकार आणण्याच्या मूडमध्ये आहे.
विकास, सुशासन, हमी, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेले क्रांतिकारी कायदे हे आमचे मुद्दे आहेत. त्याचे कोणतेही उत्तर भाजपकडे नाही. ते घाबरले आहेत. त्यांच्याकडे मतदारांना दाखवण्यासारखेही काही नसल्यामुळे ते खोटे आरोप करत आहेत. ते केवळ खोटे बोलतील आणि गांधी कुटुंबाबद्दल बोलतील.
गेल्या 30 वर्षांपासून गांधी कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे सरकारमधील कोणतेही पद नाही. ते केवळ कॉंग्रेस पक्ष सांभाळत आहेत. असे असताना भाजपच्या पोटात का दुखते आहे? भाजपने गांधी कुटुंबाला लक्ष्य करण्याऐवजी आम्हाला लक्ष्य करावे, आमच्यावर टीका करावी कारण या भागात आम्ही काम करतो आहे. ते गांधी कुटुंबाला घाबरतात का? असे जर असेल तर गांधी कुटुंबाची विश्वासार्हता आजही देशात सगळ्यांत जास्त असल्याचे सिद्ध होते.
गेहलोत पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांची अंमलबजावणी होतच राहील. आम्ही आणखी काही नव्या योजना आणू. भाजपवाले पेपर लीक घोटाळ्याबाबत बोलत आहेत. मात्र, आम्ही अगोदरच त्यावर कारवाई केली आहे. अन्य राज्यांनी मात्र त्यावर काहीही कृती केलेली नाही.