जयपूर – राजस्थातील व देशातील परिस्थिती बदलत आहे, अधिकाधिक लोक कॉंग्रेसला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागतील असे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. भाजपला राजस्थानात गेल्यावेळेसारखा क्लीन स्वीप मिळणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्यावेळी भाजपने राज्यातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या, पण आता परिस्थिती वेगळी आहे आणि लोकही काँग्रेसला पसंती देत आहेत. काँग्रेस किती जागा जिंकेल हे मी सांगू शकत नाही. पण परिणाम धक्कादायक असू शकतात, लोक काँग्रेसच्या बाजूने येत आहेत, असे गेहलोत यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. अग्निवीर किंवा कलम 370 हे त्यांचे निर्णय आहेत. पण हे मुख्य मुद्दे नाहीत.
देशासमोरील मुख्य समस्या बेरोजगारीची आहे, मात्र त्यावर भाजपचे नेते काहीच बोलत नाहीत. सत्तेत असलेल्या पक्षाचे कर्तव्य आहे की जनतेच्या भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यांनी बोलले पाहिजे पण, यावर फक्त राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेतेच बोलत आहेत.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, भाजपने कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर वैध तथ्यांवर टीका करण्याऐवजी आणि त्याला चांगला पर्याय सुचवण्याऐवजी त्यांनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची तुलना मुस्लिम लीगशी केली आहे. आम्ही पाच न्याय आणि २५ हमींवर लोकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तुम्ही त्याबद्दल बोलू शकता किंवा यापेक्षा चांगले काहीतरी सुचवू शकता. त्याऐवजी, तुम्ही म्हणत आहात की जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे, या दोन्ही गोष्टींना जोडण्याची काय गरज आहे, असा सवाल त्यांनी केला.
भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. ते विरोधी पक्षाला महत्त्व देत नाहीत. आता लोक चिंतेत आहेत की, संविधानाचे काय होईल, ते बदलण्याचा त्यांचा मनसुबा दिसतो आहे. कालच आरक्षण संपुष्टात येणार नाही असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्र्यांना द्यावे लागले असेही गहलोत यांनी नमूद केले. भाजपने चारशे पारचा दावा केला असला तरी निकाल आश्चर्यकारक असतील असा दावाही त्यांनी केला. देशाचा आणि काँग्रेसचा डीएनए एकच असून देशाला अखेर काँग्रेसकडेच पाहावे लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.