अंकुश महाडीक
सणबूर -लॉक डाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्यावर जगायचं कसं हा प्रश्न अनेकांच्या समोर उभा आहे. पण जाच्याकडे संघर्ष करण्याची जिद्द आहे, तो कधी थांबत नाही. आणि तो कधी हारतही नाही. ढेबेवाडी येथील प्रसिध्द व्यापारी परशुराम मोरे यांनी लॉक डाऊनमध्ये व्यवसाय बंद पडल्यावर स्वतःच्या मालकीच्या पडीक जमिनीवर फळबागा फुलवल्या. त्यांची ही जिद्द लॉक डाऊनमध्ये हाताला काम धंदा नाही म्हणून हताशपणे जगणाऱ्या अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देणारी अशीच ठरली आहे .
मुंबईला कष्ठ करत गावाकडील मातीत सोन पिकवणारा ग्रामीण भागातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शहराकडे स्थलांतर झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोळेकरवाडी, ता. पाटण येथील मुळचे रहिवाशी असलेले परशुराम मोरे वीस वर्षापूर्वी व्यवसायानिमित्त ढेबेवाडी येथे स्थलांतर झाले. व्यवसात पाय पसरु लागल्यावर शेतीत राबून काही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, हे लक्षात आल्यावर मोरे कुटूंबाने शेती व्यवसाय बंद केला. अनेक वर्षापासून गितांजली वस्त्रालय या नावाने कापड दुकान सुरू आहे.
मात्र, करोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू झाला. व्यवसाय बंद पडल्याने अनेकांच्यासमोर जगायच कसं आणि खायचं काय हा प्रश्न उभा होता. जगण्यासाठी कोणी भाजी विकत होता. तर कोणी कांदे, बटाटे विकून आपले कुटूंब चालवत होता. अशा वेळी खचून न जाता मोरे कुटूंबाने पहिल्या दिवसांपासून प्लॅन तयार करुन कोळेकरवाडीच्या डोंगरातील अनेक वर्ष पडीक असलेली जमीन लागवडी खाली आणायचा निर्णय घेतला. भर उन्हात आपल्या कुटुंबास वीस वर्षांपासून पडीक असलेल्या माळरानावर मेहनतीने लागवडीसाठी तयार केली.
दोन एकर जमिनीमध्ये 145 हापूस आंब्यासह चिकू, सीताफळ पेरू, काजू, नारळ, फणस या झाडांची लागवड केली. एवढेच नाही तर जवळपास एक एकर जमिनीमध्ये बटाटा, मिरची, शेवगा, भेंडी, यासारख्या भाज्यांची देखील लागवड केली आहे. स्वखर्चातून एक छोटसे शेततळे काढून शेतीसाठी पाणी उपलब्ध केले आहे. दररोज 25 ते 30 मजूर येथे काम करत आहेत. अनेकांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. त्यांच्या या व्यवसायात त्यांची पत्नी मालन मोरे व मुलगा अजय मोरे नातू रुषीकेश यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. लॉक डाऊनमुळे खचून न जाता त्यांनी लाखो रुपये खर्च करुन जिद्दीने उभा केलेला हा शेती व्यवसाय मुंबई, पुणे सारख्या शहराकडे नोकरी कामाधंद्यासाठी धावणाऱ्या लोकांसाठी दिशादर्शक ठरला आसच ठरला आहे.