Flights delayed at Delhi Airport : देशात सध्या कडाक्याचा गारठा जाणवत आहे. उत्तर भारतावर तर पूर्णपणे धुक्याची चादर पांघरली असल्याचे दिसत आहे. त्यातच राजधानी दिल्लीतील धुक्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली विमानतळावरील दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प झाली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर याचा मोठा परिणाम झाला. दाट धुक्यामुळे दृष्यमानता फारच कमी झाली होती. त्यामुळे तब्बल 110 विमान उड्डाणांना विलंब झाला आहे.
दिल्लीतील दाट धुक्यामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल करण्यात आला. अनेक विमान उड्डाणांमध्ये अजूनही विलंब होत आहे. सध्या जवळपास 125 विमानांमधील प्रवाशांना प्रवास करण्यास उशीर झाला आहे. यामध्ये 15 विदेशात जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. तर इतर भारतामध्येच प्रवास करणार आहेत.
दरम्यान, आज सकाळी दृष्यमानता कमी झाल्यामुळे पटना, अहमदाबाद, पुणे, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये जाणाऱ्या विमान उड्डाणांना तासंतास विलंब होत आहे. पटनाला जाणारे विमान 5 तास उशीरा पोहचले आहे. शिवाय, अहमदाबादहून उड्डाण करणारे विमानाला 8 तासांचा विलंब झाला आहे. सकाळी 10.00 वाजेपर्यंत विमानतळावरिल दृष्यमानता 175 मीटर होती. जेव्हा धुके कमी होण्यास सुरुवात झाली तेव्हाही, दृष्यमानता 500 मीटर होती.
दृष्यमानता कमी झाल्यानंतर विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तिन्ही रनवे वरती दृष्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये कमी दृश्यता असतानाही विमानांच्या उड्डाणांसाठी प्रयत्न करण्यात आला. यासाठी विेशेष उपाययोजना राबविण्यात आली होती. दिल्लीच्या विमानतळावर दाट धुके पडल्यानंतर उपाययोजना राबविण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत. एखाद्या विमानतळावर दाट धुक्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास याला ‘कॅटगिरी 3’ म्हणून ओळखले जाते. शिवाय कॅटगिरी 1 आणि 3 देखील आहे. मात्र, ‘कॅटगिरी 3’मध्ये दृष्यमानता फारच कमी असते. अशा परिस्थिती वैमानिकांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते.