सातारा -आरोग्य विभागाकडून जाहीर केलेल्या अहवालांनुसार जिल्ह्यात गेल्या 24 तासांत करोनामुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाला. गेले सलग चार दिवस करोनाबळींची संख्या कमी येत आहे; परंतु वैद्यकीय तज्ज्ञांच्या इशाऱ्यानुसार करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने धोका अजून टळलेला नाही. सणासुदीत खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता कायम आहे. करोनामुळे आतापर्यंत एकूण 1634 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना देगाव, ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, पानमळेवाडी, ता. सातारा येथील 44 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना आंधळी, ता. माण येथील 70 वर्षीय महिला, कुसगाव, ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील 62 वर्षीय पुरुष, अशा एकूण पाच बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.