मुकुंद भालेराव
नगर – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुत्र्यांची दहशत वाढत आहे. भटकी कुत्री थेट माणसांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात श्वानदंशाच्या घटना वाढल्या आहेत. आरोग्य केंद्रात कुत्र्यांनी चावा घेतलेले चार ते पाच रुग्ण रोज उपचारासाठी येतात. मागील दोन महिन्यातच तब्बल ५ हजार ५०३ श्वानदंशाच्या घटनांची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. या आकडेवारीवरून सहज लक्षात येते की ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची समस्या किती गंभीर बनली आहे.
ग्रामीण भागात कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने श्वानदंशाचे प्रकार वाढत आहेत. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यात श्वानांना सहज खाद्य मिळते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत
आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना कुत्रे आडवे आल्याने अपघात तर होतातच. परंतु श्वानदंशाच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. कुत्र्यांनी चावा घेतलेले चार ते पाच रुग्ण दररोज उपचारासाठी आरोग्य केंद्रात येत असल्याचे वैद्यकिय अधिकारी सांगतात. मागील एप्रिल आणि मे २०२२ या दोन महिन्यांत तब्बल ५ हजार ५०३ श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात २९२३ तर मे महिन्यात २५८० श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७२२ श्वानदंशाच्या घटना नेवासा तालुक्यातील आहेत.
‘असा’ ही आहे त्रास
कुत्र्यांना पाहून पळाल्याने कुत्रे पाठलाग करतात. रात्रीच्या वेळी तर अंगावर धावून येतात. काही वेळेस चार ते पाच कुत्र्यांचे टोळके एकत्रित हमला करतात, असे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिकही या भटक्या कुत्र्यांच्या नेहमीच तक्रारी करत असतात.
या कारणांमुळे वाढली समस्या
गावतील कचऱ्याची समस्या, लोकसंख्येचा रेटा, निर्बीजीकरणातील अडथळे, औषधोपचारांची वानवा, उघड्यावर पडलेले अन्नपदार्थ यांमुळे भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे. या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात ग्रामपंचायती अपयशी ठरल्या आहेत. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने या समस्येत वाढ झाली आहे. ग्रामपंचायतींकडे बऱ्याचदा कुत्रे पकडण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नसते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
कुठे किती श्वानदंश ?
अकोले १३५, जामखेड १८२, कर्जत ३०१, कोपरगाव ३६५, नगर तालुका ३८७, नेवासा ७२२, पारनेर ४५७, पाथर्डी ३३२, राहाता ३३०, राहुरी २२५, संगमनेर ६१७, शेवगाव २९३, श्रीगोंदा ६४४, श्रीरामपूर ४५३