सातारा – सात महिन्यापासून बंद राहिलेली सातारा शहरातील हॉटेल्स सोमवारपासून काही अटीशर्तीवर 50 टक्के क्षमतेने सुरु झाली. हॉटेलमध्ये येणाऱ्यांची थर्मल गनने तपासणी करूनच त्यांना खाद्यपदार्थांच्या आस्वादासाठी प्रवेश दिला जात होता.
हॉटेल व बार सुरु झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने करोना प्रतिबंधासाठी हॉटेल व्यावसायिकांना निर्देश दिले असून त्याचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बार व रेस्टॉरंट असोसिएशन पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन “मिशन बिगीन’अंर्तगत हॉटेल व्यावसायिकांना 50 टक्के क्षमतेने हॉटेल व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली. बारलासुद्धा परवानगी मिळाल्याने घरीच “मयखाने मे’ म्हणणाऱ्या मद्यप्रेमींनाही दिलासा मिळाला आहे.
सोमवारी सातारा शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये गिऱ्हाइकांची वर्दळ दिसून आली. बहुतांश रेस्टॉरंटनी हॉटेल लॉबी व अर्तगत भाग निर्जंतूक करून सर्व व्यवस्था चोख केली होती. सर्वांची आधी थर्मल गनने तपासणी करून मगच प्रवेश दिला जात होता. व्हेज आणि नॉनव्हेजच्या खवय्येगिरीसाठी आसुसलेल्या सातारकरांनी यानिमित्ताने चांगलाच आडवा हात मारायला सुरवात केली आहे.
हॉटेलसाठीचे नियम…
मास्क घातलेल्या ग्राहकांना प्रवेश व थर्मल गनने तपासणी
ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याच्या स्पष्ट सूचना
डीजिटल पेमेंटला प्राधान्य
हॉटेल कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी
डीजिटल मेन्यू कार्ड व डिस्पोजेबल नॅपकिनचा वापर आवश्यक
वेळेबाबत हॉटेल व्यावसायिकांची नाराजी
जिल्हा प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना परवानगी दिली असून आस्थापनांची वेळ सकाळी नऊ ते सात अशी आहे. यासंदर्भात हॉटेल टुरिझम ऑफ साताराचे अध्यक्ष चंद्रसेन जाधव यांनी हॉटेलला परवानगी देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, सायंकाळी सातनंतरची वेळ पुढे दोन तास वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बहुतांश ग्राहक व मद्यप्रेमींचा मेजवानीचा कल रात्री उशिराच असतो. प्रशासनाने दिलेली वेळ ग्राहक व व्यावसायिकांसाठी अडचणीची असल्याचे मत हॉटेल व्यावसायिकांनी नोंदवले .