सातारा, (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी प्राचार्य रमणलाल शहा यांच्या ‘फुले, शाहू, आंबेडकर एक शोध – समता’ या ग्रंथाचे प्रकाशन छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बॅ. पी. जी. पाटील सभागृहात नुकतेच उत्साहात झाले.
संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी अध्यक्षस्थानी होते. सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, ऑडिट विभागाचे सचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव बी. एन. पवार, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे व प्राचार्य शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार श्रीनिवास पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस येऊन प्राचार्य शहा यांना शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य शहा यांनी प्रास्ताविकात ग्रंथ लेखनामागची भूमिका विशद केली. फुले हे सत्यवादी संत होते. शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया यांच्यासाठी त्यांनी कार्य केले. ते ब्राह्मणविरोधी नव्हते. राजर्षी शाहू हे महात्मा फुले यांचे खरे वारसदार होते. वेगवेगळ्या समाजांसाठी त्यांनी शाळा काढून, सर्वांगीण सुधारणा केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विषमतेचे चटके बसले. त्यांची ग्रंथसंपदा 50 हजार होती. फुले, शाहू, आंबेडकर हे सेवाभावी, त्यागी आणि संयमी होते. महाराष्ट्र प्रगतिपथावर असल्याचे श्रेय या तिघांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिणार असल्याचे प्राचार्य शहा यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. मेनकुदळे म्हणाले, नवा समाज निर्माण करण्याचे काम जोतिराव फुले यांनी केले. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, म्हणून शाहू महाराजांनी शाळा सुरू केले. मनुस्मृतीसारखा ग्रंथ जाळून बाबासाहेबांनी समताधिष्ठित समाजरचनेचा ध्यास घेतला. पुढे कर्मवीरांनी समतेचा व शिक्षणाचा विचार गतिमान केले.
चंद्रकात दळवी म्हणाले, हे पुस्तक योग्य वेळी प्रकशित होत आहे. महापुरुषांवर लिहिताना एक चूक झाली, तरी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सरांनी धैर्याने लेखन केले आहे. हे पुस्तक डिजिटल, ऑडिओ बुक या माध्यमात यावे.
साहित्यिक राजेंद्र माने, शिरीष चिटणीस, प्रा. पुरुषोत्तम सेठ, प्रा. श्रीधर साळुंखे, प्रा. सुहास साळुंखे, डॉ. अच्युत गोडबोले, पत्रकार केशव चव्हाण, गजानन चेणगे, प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, चंद्रकात शहा, महेश कुलकर्णी, विनायकराव आगाशे, अजित साळुंखे, रवींद्र झुटिंग, सतीश देशमुख, सुरेश गायकवाड, गोविंद कोष्टी, स्वप्ना अवसरे, डॉ.श्याम देव, हृषीकेश सारडा, बाळासाहेब वाघ, विजयकुमार लांडगे उपस्थित होते. सुजीत शेख यांनी सूत्रसंचालन केले.