दहिवडी, {प्रविण राजे} ‘आई-वडिलांनी मुलाची केली हत्या’ अशा अनेक घटना महाराष्ट्रातून ऐकायला व बातमीच्या माध्यमातून वाचायला मिळतात. तर कधी कधी ‘मुलानेच केली आई-वडिलांची हत्या’ आशा बातम्या देखील वाचायला मिळतात. मात्र, का घडतात असे प्रकार असा अनेकदा नागरिकांना प्रश्न पडतो. माण तालुक्यातील शिरवली गावात घडलेल्या अशाच दुर्दैवी घटनेमुळे हा सवाल आता सामाजिक पटलावर आला आहे. या घटना माणवासियांना धक्का देण्यार्या आहेत.
मुलगा होऊ दे म्हणून देवासमोर लोटांगण घेऊन नवस करतात. मुलगा झाला म्हणून सोशल मीडियावर स्टेटस ठेवून गावभर पेढे वाटतात. कधी कधी स्वतः उपाशी राहून मुलांना चांगले खायला घालतात. मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठी नोकरी मिळवावी अशा अपेक्षेने वाटेल तेवढे पैसे खर्च करून चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतात. मुलगा अधिकारी होऊन गावात नाव कमवेल आम्हालाही उतारवयात चांगला सांभाळेल अशा अनेक अपेक्षा ठेवून आई-वडील जगत असतात.
पहिली ते दहावीपर्यंत मुलगा शिक्षणासाठी घराजवळच असल्याने आई-वडिलांच्या संस्काराखाली वावरत असतो. मात्र महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतर या रंगीत संगीत दुनियेतील मित्र-मैत्रिणीसोबत व्यसनाधीनतेच्या आहारी जातात. शैक्षणिक नुकसान करून घेतात आणि आपली प्रतिष्ठा संपवून घेतात.
त्यानंतर समाजामध्ये कुठेही स्थान मिळत नसल्याने भरकट जातात, या सर्व गोष्टींचा परिणाम आई, वडील, भाऊ, बहीण सर्वांना सहन करावा लागतो. कालांतराने आई-वडील आणि मुलांमध्ये काही कारणाने छोटे-मोठे किरकोळ वाद ही होतात. कुठेही चांगली नोकरी मिळत नसल्याने दारू पिऊन आई वडील भाऊ बहीण यांना अनेकदा मारहाण करून दारुसाठी पैसेही मागतात.
असाच एक प्रकार काल माण तालुक्यातील शिरवली या गावांमध्ये घडला. मुलगा चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून ट्रक ड्रायव्हर झाला. ड्रायव्हिंग करता करता व्यसनाधीन झाला. आई वडिलांनी कसेतरी करून त्याचे लग्न लावून दिले. लग्नानंतर दारू पिणे पूर्णपणे बंद करून सुधारेल अशी त्यांच्या अपेक्षा होती. मात्र लग्नानंतर हा रोजच दारू पिऊ लागल्याने काही दिवसातच बायकोही सोडून माहेरी निघून गेली. बायको पुन्हा नांदायला येत नसल्याने हा आई-वडिलांना मारहाण करू लागला.
मुलगा गेला अन आई वडिल आता तुरुंगात
काही दिवसानंतर मोठ्या भावाचे अचानक निधन झाले. भावाच्या विधवा बायकोवर वाईट नजर ठेवून. चारित्र्याच्या संशयावरून धमक्या देत होता. अल्पवयीन पुतण्याला देखील जीवे मारण्याची धमकी देत होता. बहिणीला देखील त्रास देत होता. खूप वेळा समजून सांगून देखील सुधारणा न झाल्याने आई-वडिलांनीच काळजावरती दगड ठेवून पोटच्या गोळ्याला संपवण्याचा निर्णय घेतला.
आणि पूर्णपणे डाव आखून मध्यरात्रीत जनावरे बांधायच्या दोरीने गळा आवळला आणि त्यानंतरही प्रतिकार करू लागल्याने डोक्यात दगड घालून स्वतःच्या मुलाचा केला. मुलाच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी केलेले कृत्य उघडकीस आल्याने आई-वडिलांनाही जेलची वारी खावी लागली. व्यसनाधीनतेने बिघडलेल्या मुलाला जीव तर गमवावा लागला पण अशा मुलांमुळे आई वडिलांचीही रवानगी कोठडीत झाली.
कासारवाडीत मुलाने वडीलांना मारले होते
काही महिन्यापूर्वी देखील माण तालुक्यातील कासारवाडी या ठिकाणी आई बापाने लाड करून सांभाळून मुलाला जॉबसाठी बाहेर कुठे पाठवले नाही. मुलगा इतका लाडावला होता की कोणतीही गोष्ट मागील तर त्याला वेळेवर द्यायला लागत होते. वेळेवर नाही दिले तर तो आई-वडिलांना मारायला उठायचा. एके दिवशी त्याने वडिलांना मटण आणायला सांगितले होते.
वडिलांनी त्याला समजावून सांगितले मटण खूप महाग आहे. आता पैसे नाहीत उद्या आणूया. याचा त्या मुलाला इतका राग आला की त्याने घरातील कुऱ्हाड उचलली आणि वडिलांना मारण्यासाठी मागे पळू लागला. पळता पळता वडील थकले. थांबल्यानंतर त्याने वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे सात, आठ वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या वडिलांचा जागेवरती जीव गेला. अशा भयानक घटना पाहून नागरिकही हैराण झाले.
मुले दारू पिऊन घरच्यांचा कर्दनकाळ ठरताहेत
काही वर्षांपूर्वी देखील माण तालुक्यातील कुराणवाडी या गावात देखील जमिनीच्या वादातून वडिलांनी स्वतःच्या मुलाचा खून करून जन्मठेपेची शिक्षाही भोगली. अशा अनेक भयानक गोष्टीवरून जनतेला प्रश्न पडत असेल. की पोटच्या गोळ्याला संपवायची वेळ आई-वडिलांवर का येते. अशा गोष्टी घडू नये म्हणून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये आदर्श विचाराची देवाणघेवाण होणे खूप गरजेचे असते.
व्यसनाधीन मित्राशी मैत्रीण न करायला लावणे. व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देऊन त्यापासून लांब राहायला सांगणे. कारण आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आई-वडिलांनी मुलाचा खून केलेल्या प्रकरणांमध्ये ९९% मुले दारू पिऊन घरच्यांचा कर्दनकाळ बनले होते. म्हणूनच जीवावरती दगड ठेवून पोटच्या गोळ्याला संपवण्याची वेळ आई-वडिलांवर येते.