मुंबई – भारतीय संघाच्या फलंदाजांनी पहिल्या दहा षटकांत गोलंदाजीचा व खेळपट्टीचा अंदाज घेत तसेच संयम ठेवून फलंदाजी करायला हवी होती. मात्र, याच षटकांत त्यांनी अनावश्यक जोखीम पत्करून अत्यंत बेजबाबदार पद्धतीने फलंदाजी केली. त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच सचिनने विराट कोहलीच्या संघाला संयम राखून पहिली दहा षटके सावधपणे खेळणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला दिला होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. साउदम्प्टन येथे झालेल्या अंतिम सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यापूर्वी भारतीय संघाला 2019 साली विजेतेपदाने हुलकावणी दिली होती.
तसेच न्यूझीलंड या विजेतेपदामुळे नशीबवान ठरला. त्यांनाही 2019 साली एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत आयसीसीच्या वादग्रस्त नियमामुळे विजेतेपदापासून दूर व्हावे लागले होते. पाच दिवसांच्या खेळात दोन दिवस वाया गेले होते. आयसीसीने 23 जून हा राखीव दिवस ठेवला होता. त्याच दिवशी या कसोटीचा निकालदेखील लागला.
कोहली व पुजारानंतर चित्र पालटले
भारताच्या या पराभवाचे अचूक कारण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले. सचिनने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने न्यूझीलंड संघाचा विजेतेपदाची गदा व करंडक असलेला फोटो पोस्ट केला आहे. सचिनने न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर भारताच्या या कामगिरीबद्दल निराशा झाल्याचे सांगितले. याचबरोबर सचिनने पराभवाचे कारणदेखील सांगितले. अखेरच्या दिवशी पहिली 10 षटके फार महत्त्वाची होती. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे पहिल्या दहा षटकात बाद झाल्याने सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला, असे सचिनने म्हटले. भारतीय संघातील फलंदाजांना दोन्ही डावात धावा करता आल्या नाहीत. या दोन्ही डावात एकाही फलंदाजाने अर्धशतक केले नाही. पहिल्या डावात 217 तर दुसऱ्या डावात भारताला फक्त 170 धावा करता आल्या.