मुंबई : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, त्यामुळे बदलेली राजकीय समीकरणं, विधान परिषदेत विरोधकांचे घटलेले संख्याबळ यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिनधास्त आहेत. दरम्यान, आजच्या धिवेशनाची सुरुवात होताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
दर्म्य, अधिवेशनाचे कामकाज सुरु झाले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या मंत्र्याची ओळख सभागृहाला करून दिली. त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि वित्त असे उच्चारले त्यावेळी शेजारी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी नाव सांगा असे म्हटले. त्यावेळी अजित पवार म्हणताच समोर बसलेल्या जयंत पाटील यांनी यांची आणि आमची जुनी ओळख आहे असे मिश्किलपणे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला आणि अजित पवार यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य उमटल्याचे पहायला मिळाले.