मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग आणि विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय आजच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला. यावेळी विरोधकांकडून विविध प्रकारे घोषणा देण्यात आल्या.
“घटनाबाह्य आणि कलंकित सरकारचा धिक्कार असो” असे पोस्टर घेऊन आंदोलन केले आहे. तसेच “सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली”, “खोके गेले, बोके गेले; सरकारमध्ये ओक्के झाले” अशी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र यावेळी शरद पवार गटाचे नेते आणि समर्थक उपस्थित नव्हते. याबाबत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की.., ‘पहिलाच दिवस असल्याने काही लोक आलेत, काही जण आले नाहीत. म्हणून उद्यापासून संयुक्त रितेने आपल्याला या सर्व गोष्टी दिसतील. तसेच पायऱ्यांपेक्षा सभागृहात नेमकी काय भूमिका घेतली जाते हे देखील महत्वाचे आहे. आणि त्यातूनच सर्वांच्या भूमिका स्पष्ट होतील. सध्या मतदारांच्या मनामध्ये लोकप्रतिनिधीकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलत चालला आहे.’ असं सचिन अहिर म्हणाले.