डांबेवाडीतील त्या लोकांना मिळाला निवारा; गावकर्यांनी मानले ‘प्रभात’चे आभार
सातारा (प्रतिनिधी) – डांबेवाडी (ता.खटाव) येथे उत्तरप्रदेशातून परवानगीने आलेल्या लोकांना गावकर्यांच्या आडमुटेपणामुळे व प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे गावाबाहेरच शेतात राहण्याची वेळ आली होती. याबाबत ‘प्रभात’ने ‘मुर्दाड प्रशासन खेळतयं लोकांच्या जिवाशी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. तातडीने त्या लोकांची भेट घेत, गावातच एका शिवारात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.
डांबेवाडी येथील मुळ रहिवाशी असलेले व सध्या व्यवसायानिमित्त उत्तरप्रदेशात स्थायिक असलेले पाच नागरिक गुरुवार दि. 30 रोजी दोन्ही राज्यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गावात आले होते. मात्र, गावातील काही टग्यांनी पोलिस यंत्रणेला हाताशी धरून या लोकांना गावात येण्यास मज्जाव केला होता. हे प्रकरण गावात तणाव होईल अशा अवस्थेत आल्याने काही लोकांनी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्या कानावर घातले होते. त्यानंतर पाटील यांनी गावात जाऊन पाहणी करण्याऐवजी गावटग्यांच्या सांगण्यावरूनच संबंधितांना फोनवरून धमकावण्यात धन्यता मानल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून याबाबत प्रभात प्रतिनिधीला दुरध्वनीवरून माहिती दिली होती.
त्यानंतर प्रभात’ने याबाबत वस्तूस्थितीचा वृत्तांत मांडताना जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सगळ्यांना सांगून झाले पण त्या बिचाऱ्यांचा मुक्काम काही शेतातून हलला नाही. त्यामुळे हे मुर्दाड प्रशासन लोकांच्या जिवाशी खेळ तर करत नाही ना? असा संतप्त सवाल उपस्थित करून प्रशासनाचे कान टोचले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक, महसुलच्या अधिकार्यांनी डांबेवाडीत जाऊन संबंधितांची गावातच एकाबाजूल राहण्याची सोय करण्याबाबत सुचना केल्या होत्या.
मात्र, पाटील यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळेच गावकर्यांनी आम्हाला गावात येण्यापासून रोखल्याचा आरोप करून शेतातच राहणार आल्याचे सांगत पाटील यांना धारेवर धरले. त्यानंतर काही सजग नागरिकांनी मध्यस्ती करून संबंधित लोकांना समजावून गावाबाहेरील एका ठीकाणी राहण्याबाबत विनंती केली. त्याला मान देत संबंधित नागरिकांनी शेतातून उठण्याच होकार दिल्याने त्यांना निवारा मिळाला आहे.
‘प्रभात’वर अभिनंदनाचा वर्षाव
‘प्रभात’ने कायमच समाजातील तळागाळातील घटकाप्रती बांधिलकी जपली आहे. त्यांच्यावर अन्याय करणारा मग तो सरकारी अधिकारी असो किवा राजकारणी त्यांच्या चुकीच्या धोरणावर नेहमीच प्रहार केला आहे. डांबेवाडी प्रकरणातही तसेच झाले लोकांची अवस्था प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी सडेतोड लिखाण केल्यानेच प्रशासनाला जाग आल्याचे सांगत ग्रामस्थांनी ‘प्रभात’वर अभिनंदनाचा वर्षाव केला.