एकावेळी सर्वाधिक प्रवाशांची जलद वाहतूक करणारी रेल्वे सेवा अंशत: सुरू होत आहे. सुमारे दोन महिन्यांनंतर प्रवासी सेवा सुरू झाली असली, तरी देखील प्रवाशांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. याशिवाय नागरिकांना प्रवासापूर्वी किमान तासभर आधी उपस्थित राहावे लागणार असल्याने, रेल्वे स्थानकापर्यंत “ट्रॅफीक’मधून मार्ग काढत, वेळेवर पोहोचण्याबाबत प्रवाशांना काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार आहे.
रेल्वेने प्रवास करताना गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर प्रवाशांना संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. याशिवाय सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप्लिकेशन डाऊनलोड करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर, प्रवाशांना कमी वजनाच्या साहित्यासह प्रवास करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे. याशिवाय स्थानक परिसर आणि गाड्यांचे प्रशासनाकडून वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
“कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश
येत्या काळामध्ये केवळ “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य प्रकारचे तिकीट असणाऱ्यांना प्रवास करता येणार नसल्याने, रेल्वे प्रवास करताना देखील प्रवाशांना तिकीट “कन्फर्म’ होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. “आरएसी’ आणि प्रतिक्षा यादी तयार केली जाईल, परंतु प्रतिक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग होणार
गाडीत चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग होणार असून, रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करता येणार आहे. याशिवाय गाडीत चढताना आणि प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी चेहऱ्यावर मास्क वापरणे गरजेचे आहे. स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवाशांनी कमीत कमी 90 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. प्रवाशांनी स्थानकावर आणि रेल्वेमध्ये सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे.
अंथरूण-पांघरूण मिळणार नाही
रेल्वेच्या वातानुकूलित कोचेसमध्ये मिळणारे अंथरूण, पांघरूण येत्या काळात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे प्रवाशांना स्वतःचे पांघरूण आणावे लागणार आहे. याचबरोबर काही कोचेसमधील पडदे देखील काढण्यात येणार आहेत.
रेल्वे स्थानकावर बॅरिकेडिंग आणि चौकोनांची आखणी
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी स्थानकाच्या आवारात बॅरिकेडींग केले आहे. जेणेकरून प्रवाशांची गर्दी होऊ नये आणि शारीरिक अंतर राखले जावे. याशिवाय विशिष्ठ अंतर ठेवून चौकोनांची देखील आखणी केली जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाने वृद्धांनी प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. करोना आटोक्यात येईपर्यंत सर्वांना सार्वजनिक शिस्तीचे पालन करावे लागणार आहे, रेल्वे प्रवास या सार्वजनिक शिस्तीचे उदाहरण ठरणार आहे.
स्थानकाच्या आवारात शारीरिक अंतर राखण्यात येणार आहे. याशिवाय निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर केलेली नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येईल.
– रेणू शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक