शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास करताना येत्या काळात वेळ आणि नियोजनाची आवश्यकता भासणार आहे. कधी लोंबकळत, कधी टप्प्याटप्प्याने प्रवास करणाऱ्या आणि मिळेल त्या बसने शहरभर फिरणाऱ्या प्रवाशांना आगामी काळात नियोजनपूर्वक प्रवास करावा लागणार आहे.
एका बसऐवजी तीन बसेसची आवश्यकता
लॉकडाऊनपूर्वी एका बसमधून 50 हून अधिक प्रवासी सहज प्रवास करत होते. मात्र, आता एका बसमधून केवळ 21 जणांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे एका बसमध्ये जाऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी आता तीन बसेसची गरज भासणार आहे. यामुळे प्रवाशांबरोबर पीएमपी प्रशासनाला बसेसचे नियोजन करावे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.
बसेस निर्जंतुकीकरण होणार
पीएमपीची बससेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येक फेरीनंतर बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. बसेसची आसने, हॅंडल्स, बार, दरवाजे आदींचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
खासगी वाहनांना प्राधान्य
पीएमपी बस कमी खर्चात एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवत असल्याने गर्दीत, लोंबकळत, उभे राहून दररोज विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी असे लाखो नागरिक प्रवास करत होते. मात्र, येत्या काळात संसर्गाच्या भीतीने अनेक नागरिक व्यक्तिगत वाहनांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाहीच
नवीन नियमावलीनुसार 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना प्रवास करता येणार नाही. त्यामुळे आता ज्येष्ठांना रिक्षा, कॅब, खासगी वाहनांचाच पर्याय स्वीकारावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होणार असली तरी त्यांच्या सुरक्षिततेसाठी ते अनिवार्य असणार आहे.
पीएमपीचे उत्पन्न, प्रवासी संख्या यामध्ये खूप घट झाली आहे. रोजचे दीड कोटीच्या घरात असणारे उत्पन्न दीड लाखाच्या घरात आले आहे. मागील कालावधीमध्ये नवीन बसेस पीएमपीने घेतल्या आहेत. मुख्यत्वे आता शारीरिक अंतर नियमित ठेवणे आवश्यक असल्याने, उत्पन्नाला अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. बसेसचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग आदी सूचनांचे पालन पुढील काही महिने करणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी निर्जंतुकीकरणाचे टनेल बसवले आहेत.
– नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी