औरंगाबाद :- जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा निर्णय राज्यातील सरकारने घेतला होता. त्यानंतर केंद्राने देखील त्याला मंजुरीही दिली. मात्र, या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
यावर आतापर्यंत अनेक सुनावण्या देखील झाल्या आहेत. दरम्यान, या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 4 ऑक्टोबरला आणि उस्मानाबादच्या याचिकेवर 5 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठात ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यंमत्री पदाचा राजीनामा देण्याच्या काही तासापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला.
त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून नामांतराचा नव्याने निर्णय घेतला. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. तर केंद्राने देखील नामांतराला परवानगी दिली होती. मात्र, याच निर्णयाला विरोध झाला आणि नामांतर करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या.
न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही बाजू जाणून घेतल्या आहेत. ज्यात सरकराने देखील आपली भूमिका वेळोवेळी मांडली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता अंतिम सुनावणीकडे लागल्या आहेत.