उस्मानाबाद – जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरु असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी हे आंदोलन देशभरात पोहोचले. त्या घटनेनंतरही मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. राज्यातील राजकीय नेते उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेत होते. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण थांबवण्यासंदर्भात विनंती केली.
स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपोषण स्थळी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली मात्र जरांगे पाटील जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचे सांगितले. राज्यभरातून त्यांच्या मागणीला आणि उपोषणाला समर्थन मिळाले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेतले.
सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावे, तसेच मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांची होती. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांचे आंदोलन सुरूच आहे.
मनोज जरांगे पाटील सध्या राज्यातील विविध भागात जाऊन सभा घेत आहेत. आंदोलनाबद्दल लोकांना माहिती देत आहेत. त्यांच्या या सभेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी जनजागृती करण्यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. या दरम्यान, आज ते उस्मानाबादमधील कळंब येथे गेले होते.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी कोणत्या नेत्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला का? 5-50 कोटी रुपयांची ऑफर दिली होती का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात माहिती दिली.
जरांगे पाटील म्हणाले, मला पैशांचं कोणी बोलूच शकत नाही. खरं सांगतोय मी… मला तसं काही बोलले असते, तर मी थेट बोललो असतो… मी काही पोटात ठेवलं नसतं…आणि सर्व समाजाला सांगितलं असतं की हे लोक मला असं बोलतायत…कारण मला भिडभाड नाही..आपलं जे असतं ते दणकून असतं…त्यामुळे ते असं म्हणूच शकत नाहीत…कारण मला ते अनेक वर्षांपासून बघतायत…त्यांनी माझी आंदोलनं हातळली आहेत, आज आहेत त्यांनीपण आणि अगोदरच्यांनी पण माझी आंदोलनं बघितली आहेत…त्यांना सगळं माहिती आहे.
जरांगे पाटील म्हणाले, मी यांच्या (नेत्यांच्या) गाडीतसुद्धा बसत नाही. कधी मुंबईला वगैरे एखाद्या बैठकीला जायचं असेल तर आम्ही आमची वर्गणी काढतो, गाडी ठरवतो आणि आमची सगळी माणसं जातो. त्यांच्याबरोबर जेवतसुद्धा नाही. वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे आणि आजवर माझं असंच काम राहिले आहे.
दरम्यान, सरकारने निजामकालीन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जीआर काढला आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील 1 कोटी दस्तऐवज तपासले आहे. मात्र, 1 कोटी दस्तऐवजांमध्ये केवळ पाच हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यात पुन्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे हेच पाच हजार कुणबी नोंदी पुरावे समजून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी?
बीड: 1022569 दस्तऐवज तपासले त्यात 1740 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर: 1516819 दस्तऐवज तपासले असून, त्यात 299 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.
जालना: 1300000 दस्तऐवज तपासले, त्यात 2000 कुणबी नोंदी मिळाल्या.
लातूर: 2251716 दस्तऐवज तपासले, त्यात 47 कुणबी नोंदी मिळाल्या.
परभणी: 722299 दस्तऐवज तपासले असून, त्यात केवळ 5 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.
नांदेड: 1640000 दस्ताऐवज तपासले असून, 150 नोंदी मिळाल्या आहेत.
हिंगोली: 1288000 दस्तऐवज तपासले असून, 18 कुणबी नोंदी आहेत.
धाराशिव: 1851005 दस्तऐवज तपासले, त्यात 356 कुणबी नोंदी आहेत.