बर्मिंगहॅम – आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) शनिवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीत झालेल्या एका वादग्रस्त घटनेबाबत माफी मागितली आहे. याशिवाय संबंधीत संपूर्ण घटनेची समीक्षा करण्याचे आश्वासनही दिले आहे.
या घटनेवरून सोशल मीडियावर विवाद सुरू आहे. या चुकीवरून अनेकांनी एफआयएचचे कान टोचले आहेत. यानंतर एफआयएचने या प्रकरणी क्षमा मागितली आहे.
एफआयएचने निवेदनात म्हटले की, बर्मिंघम राष्ट्रकुल खेळात ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला संघांदरम्यान झालेल्या उपांत्य सामन्यादरम्यान शूटआऊट चुकून खूपच लवकर सुरू झाले होते. यावेळी घड्याळ चालूच झाले नव्हते. ज्यासाठी आम्ही क्षमा मागतो. अशा परिस्थितीत पुन्हा पेनल्टी शूटआऊट घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा पेनल्टी शूटआऊट घेतला. एफआयएच या संपूर्ण घटनेचा पूर्णपणे तपास घेईल. जेणेकरून भविष्यात अशा समस्यांपासून वाचता येईल, असे नमूद केले.
दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी शूटआउटमध्ये 3-0 असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तर भारत आता कांस्य पदकाच्या सामन्यात खेळणार आहे. या सामन्यादरम्यान एका विचित्र प्रकारामुळे भारतीय संघाच्या हातून सामना निसटला.