मुंबई – यंदा महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात मंदावलेली असतानाही जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
या विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 31 जुलैपर्यंत 677.5 मिमी पाऊस पडला आहे, जो नेहमीच्या सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक आहे, 7 जूनच्या आसपास मान्सुन राज्यात दाखल होतो, पण यंदा तो 11 जूनपर्यंत लांबला होता आणि तो संथपणे सुरू झाला होता. पण नंतरच्या काळात मात्र पावसाने ही कमतरता भरून काढली.
जून महिन्यात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाला होता, तथापि, नंतर त्याची तीव्रता प्रचंड वाढली आणि जुलैच्या अखेरीस राज्यात अतिवृष्टीची नोंद झाली. महाराष्ट्रात जूनमध्ये 147.5 मिमी इतका पाऊस पडला आहे.
मराठवाड्यात नेहमीपेक्षा 61 टक्के जास्त पाऊस झाला, तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनुक्रमे 25 आणि 39 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात 6 टक्के जास्त पाऊस झाल्याचे हवमान विभागाने सांगितले.