शेवगाव (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरगावाहून गावात येणाऱ्या व्यक्तीपासून संभाव्य धोका टाळण्याच्या उद्देशाने आता गाव पातळीवर करोना ग्राम सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
कोरोनाबाबत झालेल्या प्रचार आणि प्रसारामुळे लोक एवढे सजग झाले आहेत की, गाव सीमा बरोबरच अनेक ठिकाणी आपापल्या गल्ल्यांच्या सीमा सुद्धा त्यांनी पाईप आडवे बांधून सील केल्याचे दिसते आहे. त्यामुळे कोणी कोणत्याही गल्लीतून आपल्या मर्जीने सहज फेरफटका मारू शकत नाही. तसेच गावात विनाकारण फिरणाऱ्यांची झाडाझडती घेतली जात आहे. असे ग्रामीण भागाचे चित्र आहे.
स्थलांतरामुळे विषाणूचा संसर्ग वाढतो. प्रवासात अनेकांचा संपर्क येत असल्याने कोण कुठून आला याची कल्पना नसते, म्हणून स्थलांतरावर सुद्धा बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रारंभी प्रांताच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा व तालुका बंदी करण्यात आली.
दरम्यान, गावातील शहरात कामासाठी आणि शिक्षणासाठी गेलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र कोणीही परस्पर गावात येऊ नये यासाठी या कोरोना ग्राम सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या.
गावातील सरपंचाच्या अध्यक्षतेखाली तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांची कोरोना ग्राम सुरक्षा समिती स्थापण्यात आली आहे. बाहेरगावाहून कोणी परस्पर गावात आल्यास सरपंच व समितीला जबाबदार धरण्यात येणार असल्याने समिती डोळ्यात तेल घालून आपले काम करत आहे.
तसेच, सहजासहजी गावात कोणी येऊ नये म्हणून गावचे रस्ते या समित्यांनी सील केले आहेत. काही गावात रस्त्यात आडवे बांबू लाकडे बांधून, दगड टाकून अडथळे निर्माण केले आहे. तर काही ठिकाणी चक्क काट्या पसरवून, रस्ता खोदून प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे.
कोणी अनोळखी गावात किंवा गावाच्या जवळपास जरी आला तरी गावकरी लगेच समितीशी संपर्क करत आहेत. त्याला परस्पर प्रवेश दिला जात नाही. प्रशासनाची परवानगी असेल तरीही त्याची वैद्यकीय तपासणी करूनच गावात प्रवेश देवून संबंधित व्यक्तिस हातावर शिक्का मारून १४ दिवस क्वारंटाईन केले जाते.
सुदैवाने शेवगाव तालुक्यात अद्याप एकही करोना बाधित रुग्ण सापडला नाही. हे येथील सर्वसामान्याच्या जागरूकतेचे प्रतिक आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व ११३ गावात करोना ग्राम सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
– मयूर बेरड, प्र. तहसीलदार