जळोची -करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभागात आत्तापर्यंत 4 कोटी 51 लाख 21 हजार 775 रुपये किंमतीची खते शेतकऱ्यांना थेट बांधावर देण्यात आली आहेत. या योजनेचा 3 हजार 900 शेतकरी गटाच्या माध्यमातून 13 हजार 574 शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे.
बारामती उपविभागात बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर या चार मंडळाअंतर्गत 472 गावांना 3 हजार 900 शेतकरी गटांकडून जवळपास 13 हजार 574 शेतकऱ्यांना 4 कोटी 51 लाख 21 हजार 775 रुपये रूपये किंमतीचे 4 हजार 71 टन खते उपलब्ध करून दिली आहेत. तसेच याच 4 मंडळातील 3 हजार 488 शेतकऱ्यांना 28 लाख 50 हजार 183 रुपये रूपये किंमतीची 493 क्विंटल बी बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राबवलेल्या थेट बांधावर खत या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा खत खरेदी दरम्यान गर्दी टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतकरी गटाकडूनच खत खरेदी करावेत. जादा दराने खत विक्री होत असल्यास तशी माहिती कृषी विभागाला कळवावी.
– बालाजी ताटे, विभागीय कृषी अधिकारी, बारामती