नवी दिल्ली ; मणिपूरमध्ये मैतई आणि कुकी समाजातील वादातून मोठ्या दंगली सुरु आहेत. मागच्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसक वातावरण आहे. आता कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हरोथेल गावात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर येत आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या मृत्यूनंतर इंफाळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कुकी समाजाच्या हरोथेल या गावावर हल्लेखोरांनी हल्ला केला. याला कुकी समाजाकडूनही प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे.
लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “हिंसाचार सुरु असलेल्या ठिकाणी जात असताना दंगलखोरांकडून लष्कराच्या तुकड्यांवर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात लष्कराकडूनही गोळीबार केला गेला. लष्कराने केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे.”
दरम्यान, दोन जणांच्या मृत्यूनंतर गुरूवारी सायंकाळी इंफाळ शहरात तणाव निर्माण झाला. शेकडो लोक मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले.