मुंबई – महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीने रणनीती आखली आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असतानाच आता शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 1 जुलै रोजी आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बीएमसीवर मोर्चा काढला जाणार आहे. याच मोर्चाच्या आधी शिवसेनेने (युबीटी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप हटाव, मुंबई बचाव! धडक मोर्चा का? या शीर्षकासह भाजप-शिवसेना सरकारवर टीका करण्यात आली आहे.
काय आहे आज चा सामनाच अग्रलेख
मुंबई महापालिका, मुंबई शहर एका बाजूला सध्याचे दिल्लीश्वर लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप व त्यांची मिंधे पिलावळही लुटमार करीत आहे. तपास यंत्रणा या घोटाळय़ांकडे डोळेझाक करीत आहेत. अशा वेळी मुंबई महापालिकेच्या रक्षणासाठी शनिवार, 1 जुलै रोजी जनता रस्त्यावर उतरत आहे. मुंबई महापालिकेची लुटमार होत असताना जो मुर्दाडासारखा बसेल तो मुंबईकर कसला? 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मुंबईस ओरबाडण्यासाठी सगळे महाराष्ट्रद्वेष्टे एक झाले आहेत. मुंबई हे महाराष्ट्राच्या भाळावरील ठसठशीत कुंकू आहे, मुंबई हेच महाराष्ट्राचे सौभाग्य! ते सौभाग्य अखंड राखण्यासाठी उद्याचा विराट मोर्चा धडकणार आहे. मुंबईकरांची ही ताकद पाहून दिल्लीलाही हादरे बसू द्या!
पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची दैना उडाली आहे. भ्रष्टाचाराने मुंबई तुंबल्याचा हा परिणाम. महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे सरकार नाही, महापौर नाहीत, विषय समित्या नाहीत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने मुंबईचा जो कारभार सध्या चालला आहे त्यास फक्त लुटमार असेच म्हणता येईल. मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व कमी करण्याचे उघड प्रयत्न सुरूच आहेत. त्यात आता मुंबई विद्रूप आणि कंगाल करून मुंबईची उरलीसुरली इभ्रत धुळीला मिळविण्याचे काम फडणवीस – मिंधे सरकार करीत आहे. मुंबई पालिकेत जी लुटमार सुरू आहे ती फडणवीस-मिंधे यांच्या आशीर्वादाने. मुंबई म्हणजे मुंबादेवी ही महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची माऊली, पण मिंध्यांसाठी मुंबई म्हणजे ‘एटीएम’ किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. भाजप अंडी खात आहे व मुख्यमंत्री मिंधे यांनी सरळ कोंबडी कापून खाण्याचे ठरवले आहे, ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर. मुंबई महानगरपालिकेत ‘नगरसेवक’ राज्य नसल्याने बिल्डर्स, ठेकेदारांच्या नियंत्रणाखाली सध्या मुंबई महानगरपालिका आहे. लुटमारीचे रोज एक नवे प्रकरण समोर येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात किमान सहा हजार कोटींचा जम्बो घोटाळा झाला आहे. ज्या पाच कंपन्यांना या कामाचे टेंडर मिळाले त्यांच्यामागचे खरे सूत्रधार हे ‘खोके’ सरकारचे मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय आहेत. पण तुमची ती ‘ईडी’ वगैरे यंत्रणा त्याबाबत डोळे मिटून बसली आहे. तोटय़ातील महापालिका शिवसेनेने फायद्यात आणली. 88 हजार कोटींच्या ठेवी मुंबई पालिकेने सुरक्षित ठेवल्या. ही
वाढली. आता या 88 हजार कोटींच्या ठेवी लुटून खाण्याचे कारस्थान सुरू आहे. मुंबई पालिकेने 52 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या काही प्रकल्पांसाठी ठेवी मोडून 15 हजार कोटी रुपये वापरण्याचा प्रस्ताव मांडला. या ठेवी मोडण्याचा प्रकार गंभीर आहे. लोकप्रतिनिधींचे राज्य नसताना या पैशांवर दरोडा टाकणे हा जनतेच्या पैशांचा अपहार आहे. मुंबईकरांच्या करांच्या पैशांतून जमा केलेल्या ठेवी ही मुंबईकरांची संपत्ती आहे. भारतीय जनता पक्ष हा व्यापारी व ठेकेदारांचा पक्ष आहे. मुंबई शहर व मुंबई महानगरपालिकेशी त्यांचे भावनिक नाते नाही. त्यामुळे मुंबईचे हे असे ओरबाडणे त्यांना व्यथित करीत नाही. मुंबईची सुरक्षा, नागरी सुविधा याबाबत कोणताही ठोस कार्यक्रम भाजप किंवा त्यांच्या मिंधे गटाकडे नाही. त्यामुळे सहा हजार कोटींची रस्त्यांची कामे बेधडक देऊन घोटाळय़ाचा मार्ग तयार केला. रस्त्यांचे सरसकट काँक्रिटीकरण हे कोणत्याही शहरासाठी धोकादायक आहे. मुंबई हे आधीच सिमेंटचे जंगल बनले आहे. त्यात काँक्रिटीकरणामुळे नाले, गटारे यांच्या मार्गात बुच लागेल. मुंबईची ड्रेनेज व्यवस्था इंग्रज काळातली आहे व त्यावरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मुंबईचा ‘जोशीमठ’ व्हायला वेळ लागणार नाही. मुंबई पालिकेत लोकप्रतिनिधी नसताना रस्ते, नालेसफाईची कामे झाली, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली व लोकांचे हाल झाले. आता शिवसेनेची सत्ता नाही. राज्य तर मिंध्यांचेच आहे. मग या तुंबण्याचे खापर कोणावर फोडणार? मुख्यमंत्री सांगतात, ‘पावसाचे स्वागत करा. मुंबईच्या तुंबण्याकडे दुर्लक्ष करा.’ हे
विधान असंवेदनशील
आहे. मुंबई-ठाण्याच्या जनतेचे पहिल्याच पावसात जे हाल झाले ते गेल्या वर्षभरात झालेल्या घोटाळय़ामुळे. रस्ते खड्डय़ात, नालेसफाई पूर्ण बोंबलली. मग या सगळय़ांवर खर्च झालेला पैसा कोठे वाहून गेला? नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 ला संपला. त्यानंतर म्हणजे 8 मार्चपासून मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली. या काळात मुंबई-ठाण्यासह सर्वच महानगरपालिकांत झालेले आर्थिक व्यवहार म्हणजे फक्त घोटाळेच घोटाळे आहेत. मुंबई महापालिकेत स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा याच काळात झाला. एकाच मर्जीतल्या कॉन्ट्रक्टरसाठी 160 कोटींची कामे ही 263 कोटींना दिली. हा मधला ‘गाळा’ ज्यांनी मारला ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच गोतावळय़ात आहेत. रस्ते, फर्निचर, आरोग्य अशा सर्वच विभागांत फक्त टेंडरबाजीला ऊत आला असून या सर्व घोटाळेबाजांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खटले चालवायला हवेत, पण सध्या साप समजून भुई धोपटण्याचे प्रकार सुरू आहेत. मुंबई महापालिका, मुंबई शहर एका बाजूला सध्याचे दिल्लीश्वर लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप व त्यांची मिंधे पिलावळही लुटमार करीत आहे. तपास यंत्रणा या घोटाळय़ांकडे डोळेझाक करीत आहेत. अशा वेळी मुंबई महापालिकेच्या रक्षणासाठी शनिवार, 1 जुलै रोजी जनता रस्त्यावर उतरत आहे. मुंबई महापालिकेची लुटमार होत असताना जो मुर्दाडासारखा बसेल तो मुंबईकर कसला? 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मुंबईस ओरबाडण्यासाठी सगळे महाराष्ट्रद्वेष्टे एक झाले आहेत. मुंबई हे महाराष्ट्राच्या भाळावरील ठसठशीत कुंकू आहे, मुंबई हेच महाराष्ट्राचे सौभाग्य! ते सौभाग्य अखंड राखण्यासाठी उद्याचा विराट मोर्चा धडकणार आहे. मुंबईकरांची ही ताकद पाहून दिल्लीलाही हादरे बसू द्या!