तळेगाव दिघे -लॉकडाऊनमुळे मार्चपासून तब्बल अडीच महिने पुणे-नाशिक महामार्ग निर्मनुष्य झाला होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद होती. आता मात्र अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर लहान-मोठ्या सर्वच वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच मालवाहू वाहनांतून प्रवाशांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनंतर पुणे-नाशिक महामार्ग पूर्वपदावर येत आहे. महामार्गावर दरोरोज लहान-मोठ्या व अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र लॉकडाऊनपासून पोलीस विभागाकडून चेकपोस्ट तयार करून वाहनांची विचारपूस होत केली जात आहे. योग्य ती काळजी महामार्ग पोलिस घेताना दिसतात. अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात असून, दंड देखील आकारला जात आहे. सध्या महामार्ग हा पूर्वपदावर येतो आहे. रहदारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनाची तपासणी करणे आता अशक्य झाले असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी सांगितले.
लॉकडाऊन शिथिल झाल्याने वाहनांची गर्दी महामार्गावर वाढली आहे. मात्र अनेक मालवाहू वाहतूक करणाऱ्या वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. तसेच ही वाहने महामार्गावरून भरधाव वेगाने जात आहेत. तसेच वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता ही अवैध प्रवासी वाहतूक राजरोस केली जात आहे. त्यामुळे ही अवैध प्रवासी वाहतूक जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.