कोपरगाव – मागील पंधरा दिवसांपासून कोपरगाव मतदारसंघात पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करीत असलेल्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावेत. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल व कृषी विभागाला आढावा बैठकीत केल्या.
आमदार काळे यांनी परतीच्या पावसाने झालेले नुकसान व सुरू असलेल्या पंचनाम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, कोळपेवाडी मंडल कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगाव व पोहेगाव मंडल कृषी अधिकारी चांगदेव दवणे, रवींद्र देशमुख आदी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले, सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाल्यामुळे कोरडा चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्याबाबत प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा. पंचनामा होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरसकट पंचनामे करावेत. सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयात सादर केलेल्या प्रस्तावांची सद्यःस्थिती आमदार काळे यांनी यावेळी जाणून घेतली. पूरग्रस्त अनुदानापासून वंचित असणाऱ्या लाभार्थींना लवकरात लवकर अनुदान द्यावे, सात-बारा, फेरफार, खरेदी-विक्री, सात-बार दुरुस्ती, आठ अ आदी उतारे काढण्याबाबत व नोंदी करण्यासाठी दिरंगाई होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून, यामध्ये सुधारणा कराव्या, अशा सूचना केल्या. कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, सभापती अनसूया होन, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवण, मंगेश पाटील, डॉ. अजय गर्जे, सुधाकर दंडवते, गोरक्षनाथ जामदार, अर्जुनराव काळे, राहुल रोहमारे, वीरेन बोरावके उपस्थित होते.