बोलता बोलता वर्षाचा सर्वात मोठा सण असलेली दिवाळी संपली. फटाक्यांच्या आवाजांनी अजूनही कान ठणकत आहेत. नेत्रदीपक रोषणाई आणि फुलबाजे, भुईनळे, भुईचक्रांची चमक अजूनही डोळ्यांसमोर आहे. फराळाचे डबे रिकामे होत आले, तरीही दिवाळीच्या मिठाईचा गोडवा मात्र मनात तसाच तरळत राहिला आहे. उद्या-परवा मुलांच्या शाळा सुरू होतील. सुटी संपेल. रोजची चाकोरी सुरू होईल. दिवाळीच्या बाकी खाणाखुणा लुप्त होऊ लागल्या तरी एक मात्र तशीच आहे. काही दिवस अजूनही राहील, आणि ती म्हणजे दारात असलेला आकाशदिवा.
मंद उजेड देणारा, रंगीबेरंगी आकाशदिवा. खरं तर आता अतिशय तऱ्हेतऱ्हेचे, विविध आकारांचे आणि वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेले आकाशदिवे मिळतात. त्यात चिनी डिझाईन्सची विपुलता नजरेत भरण्याइतकी असते.
दिसायला सुबक-सुंदर असणाऱ्या या आकाशदिव्यांची उलाढाल फार मोठी असते आणि या चिनी आकाशदिव्यांनी भारतीय आकाशदिव्यांचे मार्केट डाउन केले आहे.
खरं तर हे जे चिनी आकाशदिवे येतात, त्यांचा आपल्या पारंपरिक आकाशदिव्यांशी काडीचाही संबंध नसतो. कारण आपले पारंपरिक आकाशदिवे बनवण्यासाठी काडी-म्हणजे बांबूच्या तयार केलेल्या काड्या किंवा कामट्या हाच सर्वात महत्त्वाचा घटक असायचा. बांबूच्या कामट्यांच्या केलेल्या आठ समान चौकटीपासून आकाशदिव्याचा सांगाडा तयार केला जायचा.
लहानपणी आम्ही घरी आकाशदिवा तयार करायचो तेव्हा चांगला बांबू शोधणे हे पहिले काम. तो तोडून त्याच्या कामट्या करून त्या तासून गुळगुळीत करून एकसारख्या लांबीच्या केल्या, की आकाशदिव्याचे अर्धेनिम्मे काम झाले म्हणायचे. नंतर त्याचे आठ चौरस तयार करायचे आणि ते एकमेकाला बांधून आकाशदिव्याचा सांगाडा तयार करायचा.
त्यानंतरचे काम म्हणजे त्यावर कागद चिकटवणे. साधे रंगीत पेपर वा दुसरे चमकदार पारदर्शक रंगीत म्हणजे जिलेटिन पेपर वापरले जायचे. अशा प्रकारचा आकाशदिवा हा सार्वत्रिक असायचा. त्यानंतरचा प्रकार म्हणजे चांदणी-तीही बांबूच्या कामट्यांचीच. त्यासाठी समान आकाराचे चार किंवा सहा त्रिकोण वापरले जायचे. तुलनेने ही बनवणे सोपे.
पण आकाशदिवा बनवणे हे कौशल्याचे काम. त्यातील खरे कौशल्य हे कागद चिकटवण्यात दिसायचे. एकही सुरकुती पडू न देता कागद चिकटवणे त्यावर पट्टया लावणे, वरच्या आणि खालच्या बाजूला करंज्या लावणे आणि अगदी खालच्या बाजूला झिरमिळ्या म्हणजे पट्ट्या लावल्या की आकाशदिवा तयार व्हायचा. त्यात पणती ठेवण्यासाठी खालच्या बाजूला चार कामट्या बांधल्या जायच्या. आता तसा कंदीलही नाही आणि त्यात पणत्याही नाहीत. आहे लखलखाट. मात्र अजूनही बहुतेक घरात दिवाळी झाल्याबरोबर आकाशदिवा काढून टाकत नाहीत. साधारणपणे तो तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवतात.
कुणीतरी व्हॉट्सऍपवर लिहिले होते, दिवाळीत आपल्या मनातील आकाशदिवा लावा. त्याच्या उजेडात आपली माणसे दिसतात का ते पाहा. ती दिसली तरच खरी खुरी दिवाळी सुरू झाली असे म्हणता येईल. अगदी खरे आहे. मी तर म्हणते, आपली माणसे दाखवणारा हा आकाशदिवा आजकाल मोठा दुर्मीळ झालेला आहे. आपल्या माणसांइतकाच दुर्मीळ. तेव्हा आपली माणसे दाखवणारा तुळशीच्या लग्नानंतरही काढू नका. तो तसाच वर्षभर राहू द्या.
योगिता जगदाळे