लाखणगांव -एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन प्रणाली बसविण्यासाठी स्वतःजवळचे पैसे खर्च केले. सरकार अनुदानाची रक्कम देणार, या भरवशावर शेतकरी राहिले. सद्यःस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असताना अनुदान बॅंक खात्यात केव्हा जमा होईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहे.
मागील वर्षी ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदानाचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरवर्षी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन अनुदान दिले जाते. 2019-20 वर्षांसाठी शेतकऱ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान देण्यात आले होते. यातील 55 टक्के रक्कम केंद्र सरकार व 25 टक्के राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार होते.
सरकार दरवर्षी हे अनुदान वेळेवर शेतकऱ्यांना देत असते; परंतु 2019-20 वर्षासाठी मात्र राज्य सरकारचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. 2020-21 साठीचे धोरण जाहीर होण्याची वेळ आली, तरीही राज्य सरकारकडून अनुदान जमा न झाल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारने 25 टक्के अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून
होत आहे.
चार-पाच एकरासाठी दीड लाखांचा खर्च
शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन बसवल्यानंतर सरकार हे अनुदान देत असते. तोपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना गुंतवणूक करावी लागते. अनेक शेतकऱ्यांनी चार ते पाच एकरात ठिबक सिंचन केले आहे. यासाठी त्यांना दीड ते दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे.
पाण्याच्या बचतीसाठी सिंचन योजना
शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी आणि उसासाठी सरकारने ठिबक सिंचनसाठी अनुदानाची योजना सुरू केली आहे.पाटपाण्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो, पाण्याची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करावा, याच उद्देशाने सरकार हे अनुदान देत असते. अनेक शेतकरीही याच कारणासाठी ठिबक सिंचन वापरतात. ठिबक सिंचनचा व्यवसाय करणारे व्यावसायिक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन जोडून देत असून, शेतकऱ्यांची कागदपत्रे व प्रस्ताव तयार करण्यात शेतकऱ्यांना मदत करतात.
केंद्र सरकारने 55 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे; परंतु राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारे 25 टक्के अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.
रवींद्र बोंबे, शेतकरी, पिंपरखेड