मुंबई : देशात मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात या मुद्दयावर तोडगा काढण्यासाठी अनेक वेळा चर्चा झाली परंतू, यातून कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या आंदोलनाला बळ मिळाले आहे. याच आंदोलनावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. केंद्रातील सरकार हे अत्यंत असंवेदनशील सरकार असल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी देशाचा अन्नदाता मागच्या महिनाभरापासून दिल्लीत आंदोलनाला बसला आहे. मात्र केंद्रातील सरकार त्यांच्याशी अत्यंत क्रुरपणे वागत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले. तसेच दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांच्या अंगावर थंड पाणी टाकून सरकारने क्रुरतेची परिसीमा गाठली असून त्याचा आम्ही सातत्याने जाहीर निषेधदेखील आम्ही केला आहे.
ज्या शेतकऱ्यांमुळे सर्वांना अन्न मिळते त्याच शेतकऱ्यांवर आता अशी वेळ येणे दुर्दैवी आहे. तसेच सरकारकडून आलेल्या धोरणांवर कोणतीही सविस्तर चर्चा करण्यात आली नाही आणि समाधानकारक तोडगा यातून निघाला नाही. सरकारला सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येतात असे वाटत आहे परंतू, शेतकऱ्यांना पैसा नको न्याय हवा असल्याचेही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.