लखनौ -उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत कुठल्याच उमेदवाराला मतदान न करण्याचे संकेत दिले आहेत. मतदानावेळी इलेक्ट्रॉनिक यंत्रावरील नोटा या पर्यायाचे बटन दाबण्याचा विचार ते करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी लखीमपूर खेरीत आंदोलनावेळी एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकरी मृत्युमुखी पडले. ते वाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषचे असल्याचे समोर आले. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या त्या घटनेमुळे लखीमपूर खेरी चर्चेत आले. आता तेथील शेतकरी विधानसभा निवडणुकीतील मतदानाबाबत त्यांची भूमिका मांडू लागले आहेत. केंद्रीय कृषी कायद्यांमुळे भाजपला मतदान न करण्याचा विचार त्यांनी जवळपास पक्का केला आहे.
त्याचवेळी भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या समाजवादी पक्षानेही आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतर पक्ष सक्षम नाहीत. कुठल्याच पक्षाकडून आम्हाला आशा नाही, अशी भावना अनेक शेतकरी उघडपणे बोलून दाखवत आहेत. लखीमपूर खेरीत 23 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.