मुंबई – पाच राज्यातील निवडणुका होणार असतांनाही अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी संतुलित अर्थसंकल्प सादर केला आहे. गुंतवणूकदारांसाठी हा अर्थसंकल्प उत्तम आहे असे ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.
तूट काही प्रमाणात वाढणार असतानाही सरकारने मॅन्युफॅक्चरिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना दिल्यामुळे विकासदर वाढण्याबरोबरच रोजगारनिर्मिती वाढेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी अपेक्षा पेक्षा जास्त कर संकलन झाले आहे. आगामी काळामध्ये करसंकलन वाढत जाणार आहे. त्यामुळे सरकारला कर्ज कमी करण्यास मदत होईल.
दरम्यान सोमवारी शेअर बाजार निर्देशांक दीड टक्क्यांनी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य एकाच दिवसात तीन लाख कोटी रुपयांनी वाढले. आता शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 2,67,40,561 कोटी रुपये इतके झाले आहे. अर्थमंत्र्यांनी कर रचनेत कसलाही बदल न करता दीर्घ पल्ल्यामध्ये कररचना संतुलित राहील असे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर आगामी काळात विकास दर वाढण्यास चालना दिली आहे. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी झाल्याचे सेंट्रल वेल्थ या कंपनीचे सल्लागार देवांग मेहता यांनी सांगितले.
जेएम फायनान्शियल या कंपनीचे उपाध्यक्ष विशाल कंपानी यांनी सांगितले की, पायाभूत सुविधात गुंतवणूक करण्याबरोबरच हरित वाहनाला चालना दिल्यामुळे आगामी काळात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. स्टार्ट अप्साठी अगोदरच पूरक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. मात्र देशाबरोबरच परदेशातही महागाई वाढणार आहे. अशा अवस्थेत महागाई वाढत असताना मागणी मात्र कमी होणे चिंतेची बाब आहे. या विषयावर आगामी काळात रिझर्व बॅंक आणि अर्थ मंत्रालयाला नेटाने प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.