रायबरेली – उत्तरप्रदेशच्या रायबरेलीत येणाऱ्या विधानसभेच्या सर्व सहा जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या गांधी परिवाराचा उत्तरप्रदेशातील एकमेव बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपने खास प्लॅन बनवल्याचे सूचित होत आहे.
देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष उत्तरप्रदेशात केवळ एक जागा जिंकू शकला. त्या निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विजय मिळवून रायबरेली मतदारसंघ आपल्याकडे राखला. मात्र, कॉंग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी लोकसभा मतदारसंघात पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत व्हावे लागले.
त्यानंतर पुढील लोकसभा निवडणुकीत रायबरेलीत चमत्कार घडवण्याचा चंग भाजपने बांधल्याचे दिसते. त्यातून त्या पक्षाने आताच्या विधानसभा निवडणुकीपासूनच पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत (2017) कॉंग्रेस रायबरेलीमधील सहापैकी केवळ दोनच जागा जिंकू शकला. विधानसभेच्या तीन जागा भाजपने खिशात घातल्या. तर, उर्वरित जागा समाजवादी पक्षाने जिंकली.
रायबरेलीमधील कॉंग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार आपल्याकडे खेचण्याची प्रक्रिया भाजपने आधीपासूनच सुरू केली. त्यातून विधानसभेवर निवडून गेलेले कॉंग्रेसचे दोन्ही आमदार याआधीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्रितपणे लढले होते. मात्र, ते यावेळी स्वतंत्रपणे लढत आहेत.
त्यामुळे यावेळी रायबरेलीतील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा विश्वास भाजपकडून बोलून दाखवला जात आहे. त्या जिंकून रायबरेली लोकसभा मतदारसंघही काबीज करण्याचे मिशन 2024 हाती घेतले जाईल, असा निर्धार त्या पक्षाचे नेते व्यक्त करत आहेत.